सोलापूर, 30 सप्टेंबर (हिं.स.)। सोलापूर जिल्ह्यातील अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे बाधित झालेल्या कुटुंबांना शासनाच्या वतीने मोफत अन्नधान्य व जनावरांसाठी चारा वाटप करण्यात येत असून जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे अत्यंत तत्परतेने मोफत धान्य वाटपाची कार्यवाही करत आहेत.
जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे यांनी सर्व तहसीलदारांना तातडीने पूरग्रस्त कुटुंबांना गतीने धान्य वितरण करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत. यामध्ये प्रत्येक कुटुंबाला दहा किलो गहू व दहा किलो तांदूळ उपलब्ध केले जात आहे. तसेच शासनाच्या नुकत्याच घेतलेल्या निर्णयाप्रमाणे लवकरच प्रती कुटुंब तीन किलो तूर डाळ वाटप केले जाणार आहे,परंतु सद्यस्थितीत गहू व तांदूळ वाटप सुरू आहे. आज रोजी पर्यंत माढा,करमाळा,उत्तर सोलापूर,दक्षिण सोलापूर,मोहोळ,अक्कलकोट व सांगोला या सात तालुक्यातील4710कुटुंबांना249क्विंटल गहू तर250.80क्विंटल तांदूळ वाटप करण्यात आलेले आहे. त्याप्रमाणे जसे तहसीलदार यांच्याकडून बाधित कुटुंबाची माहिती मिळत आहे,त्याप्रमाणे पुरवठा विभागाकडून मोफत धान्य वाटप तात्काळ केले जात असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी श्री. सरडे यांनी दिली.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड