
बीड, 1 जानेवारी (हिं.स.)।
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते नववर्षाच्या प्रथम शुभदिनी बीड जिल्ह्याच्या विकासाला नवी दिशा देणारा ऐतिहासिक सोहळा छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण येथे संपन्न झाला. जिल्हा परिषद बीड अंतर्गत १३६३ विकास कामांचं भूमिपूजन व आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण कार्यक्रमाला उपस्थित राहून जनतेशी संवाद साधला.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, बीड जिल्ह्याच्या निर्मितीनंतर प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणावर विकास कामांचा शुभारंभ होत असून, ग्रामीण भागापर्यंत मूलभूत सुविधा पोहोचवण्याचा आमचा ठाम संकल्प आहे. पाणीपुरवठा, रस्ते, वीज, शिक्षण, आरोग्य, शाळांचं सुसज्जीकरण, समाजोपयोगी लघु विकासकामं यांवर विशेष भर देण्यात आला आहे. ग्रामीण भागातील १२०० हून अधिक शाळांची कामं सुरूअसून शिक्षण आणि समाज यांच्यातील नातं अधिक घट्ट झालं आहे. विद्यार्थ्यांसाठी विविध योजनांच्या माध्यमातून सातत्यानं मदत दिली जात आहे.
बीडमध्ये इलेक्ट्रिक रेल्वे, विमानतळ प्रकल्प तसंच स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय, अंबाजोगाई यांसारख्या महत्त्वाच्या प्रकल्पांसाठी शासन प्रयत्नशील आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी तातडीनं उपाययोजना राबवण्यात येत आहेत.
विकास कामांचा दर्जा राखला गेला पाहिजे, याबाबत अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, हीच आमची भूमिका आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या दूरदृष्टीनं स्वराज्य उभारलं, त्याच प्रेरणेतून बीड जिल्ह्याचा सर्वांगीण विकास घडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis