
पुणे, 11 जानेवारी (हिं.स.)।
शहरात यापूर्वी केलेल्या ‘मोफत सेवा’ घोषणांचा अनुभव लक्षात घेतला, तर सध्या मेट्रो आणि पीएमपीचा प्रवास मोफत करण्याची घोषणा ही केवळ निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून केलेली फसवी घोषणा असल्याची टीका केंद्रीय सहकार व नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केली आहे. निवडणूक हातातून निसटून गेल्याने राष्ट्रवादीकडून हा ‘चुनावी जुमला’ केला गेला, असेही मोहोळ म्हणाले.
मोहोळ पुढे म्हणाले, ‘‘संगमवाडी ते विश्रांतवाडी या मार्गावर बीआरटी सेवा सुरू केली, तेव्हा या सेवेचे ब्रँडिंग करण्यासाठी एक महिना मोफत सेवा देण्याची घोषणा राष्ट्रवादीचे तत्कालीन महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी केली होती. मात्र प्रत्यक्षात हा निर्णय काही दिवसांतच बदलण्याची नामुष्की आली.तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ३० ऑगस्ट २०१५ ला या बीआरटी मार्गाचे उद्घाटन करताना मोफत सेवा देणे अव्यवहार्य असून केवळ चारच दिवसांत बंद करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आणि मोफत सेवेचा गाजावाजा टिकाव धरू शकला नाही, असे असतानाही पुन्हा अजित पवार यांनी मोफतची घोषणा करणे म्हणजे पुणेकरांची शुद्ध फसवणूक आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु