
नांदेड, 11 जानेवारी (हिं.स.)।
भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या असंयमी आणि वादग्रस्त वक्तव्यांविरोधात नांदेडची जनता तीव्र संताप व्यक्त करत असून, अशा नेत्यांना योग्य तो हिसका दाखविल्याशिवाय राहणार नाही, असा ठाम इशारा काँग्रेसचे नांदेडचे खासदार रविंद्र चव्हाण यांनी दिला आहे.
मुंबईसारख्या महानगरातून येऊन नांदेडमध्ये भाजपाची सत्ता येईल, अशी स्वप्ने पाहणारे रविंद्र चव्हाण यांचा नांदेडच्या प्रश्नांशी नेमका काय संबंध आहे? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. नांदेडच्या करदात्यांशी, विकासाशी किंवा येथील जनतेच्या भावनांशी कोणताही थेट संबंध नसताना कोणत्या अधिकाराने आणि कशाच्या बळावर ते असे वक्तव्य करत आहेत? असा प्रश्नही त्यांनी विचारला.
जिभेवर नियंत्रण नसलेल्या नेत्यांना जनता कधीही थारा देत नाही, हे इतिहासाने वारंवार सिद्ध केले आहे. परवाच लातूरच्या सभेत केलेली वक्तव्ये याचे जिवंत उदाहरण असून, अशा प्रकारच्या राजकारणाला नांदेडची परंपरा कधीच मान्यता देत नाही, असे खासदार चव्हाण म्हणाले.
नांदेड आणि लातूर हे केवळ शेजारील जिल्हे नसून, एका विचारधारेने आणि गुरु शिष्य परंपरेने जोडलेले जिल्हे आहेत. काँग्रेस पक्षाच्या विचारधारेवर श्रद्धा ठेवणारी जनता आजही नांदेडमध्ये मोठ्या संख्येने आहे. पूर्वीचा काँग्रेसचा स्वाभिमान पुन्हा उभा करण्याची ताकद या जनतेत आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis