भारताला निवडकपणे लक्ष्य करणे अन्यायकारक, पोलंडसमोर जयशंकर यांची ठाम भूमिका
नवी दिल्ली, 19 जानेवारी (हिं.स.)।भारत आणि पोलंड यांच्यातील धोरणात्मक भागीदारीबाबत नवी दिल्लीत झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी ठाम भूमिका घेतली. पोलंडचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री रादोस्लाव सिकोरस्की यांच्यासमोर रश
भारताला निवडकपणे लक्ष्य करणे अन्यायकारक, पोलंडसमोर जयशंकर यांची ठाम भूमिका


नवी दिल्ली, 19 जानेवारी (हिं.स.)।भारत आणि पोलंड यांच्यातील धोरणात्मक भागीदारीबाबत नवी दिल्लीत झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी ठाम भूमिका घेतली. पोलंडचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री रादोस्लाव सिकोरस्की यांच्यासमोर रशिया–युक्रेन युद्धाच्या नावाखाली भारताला “निवडक आणि अन्यायकारक पद्धतीने” लक्ष्य केले जात असल्याबद्दल जयशंकर यांनी तीव्र आक्षेप नोंदवला. पाकिस्तानचे नाव न घेता त्यांनी कठोर इशारा देत सांगितले की पोलंडने दहशतवादाबाबत “शून्य सहिष्णुतेचे” धोरण स्वीकारले पाहिजे आणि सीमापार दहशतवादाला प्रोत्साहन देणाऱ्या देशांना थेट किंवा अप्रत्यक्ष पाठिंबा देऊ नये.

नवी दिल्लीत झालेल्या या भेटीदरम्यान जयशंकर यांनी भारताच्या चिंता पोलंडच्या उपपंतप्रधानांसमोर मांडल्या. या वेळी दोन्ही देशांनी भारत–पोलंड धोरणात्मक भागीदारीच्या विस्ताराचा आढावा घेतला तसेच प्रमुख प्रादेशिक आणि जागतिक घडामोडींवर विचारांची देवाणघेवाण केली. पोलिश शिष्टमंडळाचे स्वागत करताना जयशंकर म्हणाले की, ही बैठक जागतिक घडामोडींमध्ये “मोठ्या प्रमाणावर उलथापालथ” सुरू असलेल्या काळात होत आहे, त्यामुळे विविध देशांमध्ये परस्पर विचारविनिमय अधिकच महत्त्वाचा ठरतो.

जयशंकर यांनी अधोरेखित केले की भारत आणि पोलंड यांचे संबंध ऑगस्ट 2024 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वॉर्सा भेटीनंतर धोरणात्मक भागीदारीच्या स्तरावर पोहोचले आहेत. आता 2024–28 या कालावधीसाठीच्या कार्ययोजनेचा आढावा घेतला जाईल आणि व्यापार, गुंतवणूक, संरक्षण, सुरक्षा, स्वच्छ तंत्रज्ञान तसेच डिजिटल नवोपक्रम या क्षेत्रांत अधिक सखोल सहकार्याच्या शक्यता तपासल्या जातील.मात्र ही चर्चा लवकरच भू-राजकारणाकडे, विशेषतः युक्रेन संघर्ष आणि त्याच्या व्यापक परिणामांकडे वळली. जयशंकर यांनी सांगितले की न्यूयॉर्क आणि पॅरिससह विविध मंचांवर त्यांनी यापूर्वीही मंत्री सिकोरस्की यांच्याशी भारताची भूमिका स्पष्टपणे मांडली होती आणि नवी दिल्लीतही तीच भूमिका पुन्हा मांडली आहे.

ते पुढे म्हणाले, “मी वारंवार हे अधोरेखित केले आहे की भारताला निवडक पद्धतीने लक्ष्य करणे हे अयोग्य आणि अन्यायकारक आहे. आज मी पुन्हा तेच सांगतो. भारत संघर्ष समाप्त करण्यासाठी संवाद आणि कूटनीतीवर विश्वास ठेवतो आणि निवडक लक्ष्य ठरवत कोणत्याही गटाच्या बाजूने उभे राहणे टाळतो.”

पोलंडचे मंत्री रादोस्लाव सिकोरस्की यांनीही एकूणच भारताच्या चिंतेला पाठिंबा दर्शवला. त्यांनी सांगितले की निवडक पद्धतीने लक्ष्य करणे अयोग्य असल्याबाबत पोलंडही सहमत आहे आणि अशा पद्धतींमुळे जागतिक व्यापारात मोठ्या प्रमाणावर अस्थिरता निर्माण होऊ शकते, असा इशाराही दिला. आपल्या देशातील अलीकडील घटनांचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की पोलंडला जाळपोळ आणि राज्य-प्राय दहशतवादाच्या प्रयत्नांचा सामना करावा लागला आहे, ज्यात रेल्वे लाईनवर झालेल्या हल्ल्याचाही समावेश आहे. दहशतवादाविरोधात कठोरपणे लढण्याची गरज असल्यावर दोन्ही देशांमध्ये सहमती झाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande