
लातूर, 23 फेब्रुवारी (हिं.स.)। शहरासह तालुक्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. दिवसभर कडक उन्हाचा तडाखा जाणवत असताना सायंकाळी अचानक वातावरणात बदल झाला आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाचा अर्धा तास पाऊस पडला. अचानक पडलेल्या पावसामुळे बाजारपेठेत व रस्त्यांवर नागरिकांची एकच तारांबळ उडाली. काही ठिकाणी वाऱ्यासह पाऊस झाल्याने उघड्यावर ठेवलेला माल, भाजीपाला विक्रेते तसेच फेरीवाले यांची धावपळ झाली.
दरम्यान, काढणीला आलेल्या गहू व ज्वारी यासह अनेक पिकांना या पावसाचा फटका बसण्याची शक्यता शेतकऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे. सध्या अनेक शेतकऱ्यांनी पिकांची कापणी सुरू केली असून काही ठिकाणी काढलेले धान्य शेतातच वाळत टाकले आहे. अवेळी पडलेल्या पावसामुळे उत्पादनात घट होण्याची भीती व्यक्त होत आहे. हवामानातील बदलामुळे पुढील काही दिवस वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता असून शेतकऱ्यांनी पिकांची काळजी घेण्याचे आवाहन कृषी तज्ज्ञांकडून करण्यात येत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis