
बीड, 24 फेब्रुवारी (हिं.स.)।धारूर तालुका परिसरात अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने मोठा तडाखा दिला. सलग या पावसामुळे रब्बी हंगामातील काढणीस आलेली पिके मोठ्या प्रमाणावर जमीनदोस्त झाली आहेत. गहू, हरभरा, ज्वारी, मोहर आदी पिके आडवी पडल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. काही ठिकाणी आंब्याच्या बागांनाही फटका बसला असून मोहोर गळून पडला आहे.
तालुक्यातील चिंचपुरे, गांजपूर, धारूर शहर, आरणवाडी,चोरांबा, आंबेवडगाव, गावदरा आदी भागांत तासभर वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. वाऱ्याचा वेग अधिकचा असल्याने उभ्या पिकांची अक्षरशः माती झाली आहे. काढणीच्या उंबरठ्यावर असलेली पिके पडल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. अनेक शेतांमध्ये पाणी साचल्याने उभ्या पिकांचे मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे. याआधी खरीप हंगामातही अतिवृष्टीमुळे सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले होते.
हरभरा गहू समवेत ज्वारी पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. प्रशासनाने तात्काळ पंचनामे करत मदत जाहीर करावी अशी मागणी पुढे आली आहे
मशागतीसाठी खर्च करून जोपासलेली पिके अवकाळी पावसाने उद्ध्वस्त झाली असून शेतकरी हतबल झाला आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी तातडीने पंचनामे करून आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी प्रशासनाकडे करत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis