
अमरावती, 24 फेब्रुवारी (हिं.स.)| ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन (AISF), जिल्हा अमरावतीच्या वतीने कमी पटसंख्येच्या नावाखाली मराठी शाळा बंद करण्याच्या निर्णयाविरोधात २५ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन च्या नेतृत्वाखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक (ईर्विन चौक) येथून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा निघणार आहे.
शिक्षण हक्क कायद्यानुसार विद्यार्थ्यांच्या घराजवळ शाळा असणे बंधनकारक असतानाही २० पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला जात असल्याचा आरोप संघटनेने केला आहे. “शाळा संकुल” रचनेमुळे ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांचे शिक्षण धोक्यात येईल, तसेच हजारो शिक्षक अतिरिक्त ठरतील, असेही निवेदनात नमूद आहे. अमरावती जिल्ह्यातील २२५ शाळा बंद होण्याच्या मार्गावर असल्याचा दावा करण्यात आला. शाळा बंदीचा निर्णय रद्द करणे, शिक्षक भरती तातडीने करणे, दत्तक शाळा योजना रद्द करणे, RTE अंतर्गत सुविधा देणे आदी १३ प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत. या मोर्चात पालक, विद्यार्थी, शिक्षक व शिक्षणप्रेमींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी