
पालघर, 24 फेब्रुवारी (हिं.स.)जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा उमेद अभियानांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या ‘पालघर मिनी सरस’चा समारोप सोहळा उत्साहात पार पडला. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे यांनी यावेळी बोलताना, “उमेद अंतर्गत स्वयंसहायता गटातील महिलांची वार्षिक उलाढाल ५० लाखांपर्यंत पोहोचावी, हे माझे स्वप्न होते. मिनी सरसच्या माध्यमातून महिलांनी ५० लाखांची वार्षिक उलाढाल गाठली असून माझे स्वप्न पूर्ण झाले आहे,” असे सांगितले.
पुढे त्यांनी नमूद केले की, सरससारख्या उपक्रमांमधून महिलांनी अधिक संधी साधल्यास एक कोटींचा टप्पा गाठण्यासाठी फार वेळ लागणार नाही. महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सरस हे प्रभावी व्यासपीठ ठरत असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले.यावेळी प्रकल्प संचालिका जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा डॉ.रुपाली सातपुते, ग्लोबल कोकण महोत्सवाचे संयोजक संजय यादवराव, समन्वयक दीपेश ठाकूर, जलजीवन मिशनचे प्रकल्प संचालक अतुल पारसकर, डहाणू गटविकास अधिकारी पल्लवी सस्ते, शिरगाव ग्रामपंचायतीचे सरपंच घनश्याम मोरे आदी उपस्थित होते.
समारोप प्रसंगी जास्त विक्री झालेल्या स्टॉल्सना प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. तसेच सर्व सहभागी झालेल्या महिला स्वयंसहायता गटांना प्रमाणपत्रे देण्यात आली.जनरल स्टॉल गटात उन्नती स्वयंसहायता समूह (पालघर) प्रथम, वारली आर्ट (विक्रमगड) द्वितीय तर स्वामिनी स्वयंसहायता समूह (पालघर) तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरले.फूड स्टॉल/खानावळ गटात सागरिका प्रथम, शिवनेरी द्वितीय आणि श्रीराम समर्थ तृतीय क्रमांकाने गौरविण्यात आले. हे तिन्ही गट पालघर तालुक्यातील आहेत.वैशिष्ट्यपूर्ण सहभागासाठी श्री स्मरण (पालघर), महालक्ष्मी (धुळे), यशोदा (रत्नागिरी), महालक्ष्मी (डहाणू) आणि स्वप्नपूर्ती (जव्हार) या गटांना विशेष सन्मान देण्यात आला.तसेच उत्कृष्ट नियोजन व समन्वयासाठी जिल्हा अभियान व्यवस्थापक रवी बोबडे, जिल्हा व्यवस्थापक (विपणन) राजश्री माने आणि तालुका व्यवस्थापक आयबीसीबी प्रभूदास गावित यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / NAVIN NARESH PATIL