
रायगड, 24 फेब्रुवारी (हिं.स.)। मुंबई उच्च न्यायालय विधी सेवा समिती यांच्या निर्देशानुसार प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण रायगड-अलिबाग राजेंद्र द. सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली “न्याय आपले दारी” या उपक्रमांतर्गत २ मार्च ते ३० मार्च २०२६ या कालावधीत संपूर्ण रायगड जिल्ह्यात फिरते लोकअदालत व कायदेशीर शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाचा नागरिकांनी मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा, असे आवाहन राजेंद्र द. सावंत यांनी केले आहे.
फिरत्या लोकअदालतीचा उद्घाटन समारंभ २ मार्च २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता रायगड जिल्हा न्यायालयाच्या प्रांगणात संपन्न होणार आहे. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश राजेंद्र द. सावंत यांच्या हस्ते उद्घाटन होणार असून यावेळी अलिबाग येथील सर्व न्यायिक अधिकारी, जिल्हा सरकारी वकील तसेच वकील संघटनेचे अध्यक्ष उपस्थित राहणार आहेत.
सदर फिरते लोकअदालत ३० मार्चपर्यंत जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये जाऊन प्रलंबित प्रकरणांचा तडजोडीच्या माध्यमातून निपटारा करणार आहे. यामध्ये लघु वाद, कौटुंबिक प्रकरणे, मोटार अपघात भरपाई दावे, बँक वसुली प्रकरणे तसेच इतर नागरी स्वरूपाच्या प्रकरणांचा जलद निपटारा केला जाणार आहे.
या उपक्रमामुळे नागरिकांना न्यायालयीन प्रक्रिया सुलभ, जलद आणि खर्चिकदृष्ट्या परवडणारी होणार असून न्याय थेट त्यांच्या दारी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी या लोकअदालतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके