
लातूर, 24 फेब्रुवारी, (हिं.स.)। लातूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर व रत्नेश्वर देवालयात वर्षानुवर्षे चक्रीभजन केले जाते. या माध्यमातून शिवमंदिरातही हरिनामाचा गजर होतो, हीच ईश्वराची खरी लीला आहे. चक्रीभजनाची ही परंपरा नाथ संस्थानकडून कधीही खंडित होणार नाही, असे प्रतिपादन सद्गुरु गुरुबाबा महाराज औसेकर यांनी केले. लातूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर व रत्नेश्वर देवस्थानच्या महाशिवरात्री यात्रा महोत्सवानिमित्त सद्गुरु गुरुबाबा महाराज औसेकर यांनी चक्रीभजनाची सेवा अर्पण केली.
यावेळी गुरुबाबा महाराज म्हणाले की, हरी आणि हर हे एकच आहेत. ईश्वराने द्वैतभाव निर्माण केलेला नाही. आपणही असा भेद करणे चुकीचे आहे. असा भेद नसल्यामुळेच सिद्धेश्वरांच्या अर्थात शिवाच्या मंदिरात हरिचिंतन होत आहे. भजनाच्या माध्यमातून आपण ईश्वराची आळवणी करतो. नवविधा भक्तीपैकी कुठल्याही मार्गाने ईश्वराची भक्ती करता येते. विशिष्ट देवांसाठी ठराविक भक्ती मार्ग नसतो. ज्या माध्यमातून तुम्हाला ईश्वर चिंतन करता येईल तो मार्ग स्वीकारावा, असे गुरुबाबा म्हणाले. ईश्वर हे अंतिम सत्य आहे. निर्गुण, निराकार ईश्वराला ज्या रूपात आपण पाहू तसाच तो भासतो. त्याला एका विशिष्ट रूपामध्ये आपण बंदिस्त करू शकत नाही. त्यामुळे मनात कुठलाही द्वैतभाव न ठेवता भक्ती करावी. हीच भक्ती आपल्याला मोक्ष मार्गाला घेऊन जाऊ शकते. हरी आणि हरामध्ये भेद करण्याची पात्रता आपल्यात नाही. त्यामुळे मिळालेल्या मानवी जन्माचे कल्याण करण्यासाठी हरिचिंतन करा, असा उपदेश सदुरु गुरुबाबा महाराजांनी केला.
गुरुबाबा महाराजांचे चक्रीभजन हा अलौकिक सोहळा असतो. तो पाहण्यासाठी आणि भजनाचा लाभघेण्यासाठी हजारो भक्तांनी यावर्षीही श्री सिद्धेश्वर मंदिरात गर्दी केली होती. यावेळी देवस्थान विश्वस्त समितीच्या वतीने प्रशासक सचिन जांबुतकर, ज्येष्ठ विश्वस्त विक्रमतात्या गोजमगुंडे, अशोक भोसले, सुरेश गोजमगुंडे, व्यंकटेश हालिंगे, विशाल झांबरे, ओम गोपे, विजयकुमार धायगुडे महादेव बन, संतोष भालेराव व मान्यवरांनी गुरुबाबा महाराजांचा सत्कार केला.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis