
छत्रपती संभाजीनगर, 25 फेब्रुवारी (हिं.स.)। स्वातंत्र्य आणि समता यांचा समतोल सांसदीय लोकशाहीत साधला जातो. त्यामुळे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सातत्यानी घटनात्मक नैतिकतेचा आग्रह धरला, असे प्रतिपादन राज्यशास्त्राचे अभ्यासक डॉ.सुरेंद्र जोंधळे यांनी केले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील राज्यशास्त्र विभागात प्रा.मोईन शाकीर स्मृती व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले. या व्याख्यानमालेत राज्यशास्त्राचे अभ्यासक प्रा.सुरेंद्र जोंधळे (माजी विभागप्रमुख, मुंबई विद्यापीठ) यांचे 'डॉ.बाबासाहेब आंबेडकर, भारतीय संविधान आणि राष्ट्रबांधणी' या विषयावर व्याख्यान झाले. राज्यशास्त्र विभागाच्या सभागृहात हा कार्यक्रम झाला. राज्यशास्त्र विभागप्रमुख तथा कुलसचिव डॉ.प्रशांत अमृतकर अध्यक्षस्थानी होते.
यावेळी डॉ.सुरेंद्र जोंधळे म्हणाले, स्वातंत्रपूर्व व स्वातंत्र्योत्तर अशा दोन्ही कालखंडात राष्ट्रबांधणी करतांना ’राष्ट्र समाजवाद’ ही संकल्पना रुजविण्याचा प्रयत्न केला. भारतीय संविधानात त्यांचे राजकीय, सामाजिक व आर्थिक योगदान राहिले आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुत्व आणि सामाजिक न्याय ही चतुःसूत्री समोर ठेऊन त्यांनी संविधानाची निर्मिती केली. जनसामान्यांना प्रतिनिधीत्व देणारे लोकशाही नागरिकत्व त्यांनी महत्वाचे मानले. सामाजिक आणि आर्थिक न्याय हे मूल्य आदर्श आसून त्यांनी घटनात्मक नैतिकतेचा आग्रह धरला, असेही डॉ.जोंधळे म्हणाले. भारतीय लोकशाहीचे महत्व टिकवायचे असेल तर सार्वजनिक उन्नती गरजेची असून सामाजिक विवेकबृध्दीला महत्व देणे गरजेचे आहे. भारतीय राज्यघटना हा एक जिवंत दस्तऐवज असून यामध्ये लोकशाहीचे चैतन्य अबाधित राहिले आहे. ’एक व्यक्ती-एक मत’ या प्रमाणेच ’एक व्यक्ती-एक मूल्य’ हे तत्वही अंमलात येणे गरजेचे आहे. तसेच सांसदीय लोकशाहीत सामाजिक आणि नैतिक सदसविवेक बुध्दीचे पालन होणार नसेल तर त्या लोकशाहीला काही अर्थ करणार नाही, असे बाबासाहेब म्हणाले होते, याची आठवण डॉ.जोंधळे यांनी उपस्थितांना करुन दिली.
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis