
रायगड, 25 फेब्रुवारी (हिं.स.)।
पर्यटनस्थळ असलेल्या माथेरानमध्ये ई-रिक्षा चालकांनी केलेल्या बंद आंदोलनाचा फटका थेट शाळकरी विद्यार्थ्यांना बसला. सकाळी शाळेत जाण्यासाठी ई-रिक्षांवर अवलंबून असलेल्या अनेक विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागला. काही विद्यार्थ्यांना पायी शाळेत जावे लागले, तर काहींना उशीर झाल्याने वर्ग चुकले. या प्रकारामुळे पालकांमध्ये संतापाची लाट उसळली होती.
ई-रिक्षा चालक संघटनेच्या काही मागण्यांवरून अचानक बंद पुकारण्यात आल्याने वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली. विशेषतः डोंगराळ भागातील व लांब अंतरावर राहणाऱ्या विद्यार्थ्यांचे हाल झाले. पालकांनी प्रशासनाकडे तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली.
दरम्यान, नुकत्याच रुजू झालेल्या माथेरान पोलिस ठाण्याच्या अधिकारी सविता मुसळे यांनी परिस्थितीची गंभीर दखल घेतली. त्यांनी ई-रिक्षा चालक प्रतिनिधी व पालकांशी चर्चा करत मध्यस्थी केली. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताचा विचार करून ई-रिक्षा बंदमधून विद्यार्थ्यांना सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला.
मध्यस्ती यशस्वी ठरल्याने विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला असून पालकांनी पोलिस प्रशासनाचे आभार मानले आहेत. पुढील काळात अशा प्रकारे विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणीही पालकांकडून करण्यात येत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके