
बीड, 25 फेब्रुवारी (हिं.स.)। महाराष्ट्रातील हजारो संगणक परिचालक बांधव मागील अनेक वर्षांपासून आपल्या न्याय्य हक्कांसाठी लढा देत आहेत. मुंबई येथील आझाद मैदानावर महाराष्ट्र संगणक परिचालक संघटनेच्या वतीने सुरू असलेल्या आंदोलनात सहभागी होऊन त्यांना आमदार संदीप क्षीरसागर यांनी जाहीर पाठिंबा दिला.
यावेळी आमदार क्षीरसागर म्हणाले, राज्य शासनाकडून सातत्याने होणारी उदासीनता ही अत्यंत चिंताजनक बाब आहे. शासनाच्या विविध कार्यालयांमध्ये संगणक परिचालकांनी अनेक वर्षे प्रामाणिकपणे सेवा दिली, पण आजही त्यांना स्थैर्य, योग्य मानधन व सुरक्षित भविष्य यासाठी संघर्ष करावा लागत आहे, ही वस्तुस्थिती दुर्दैवी आहे.
हे आंदोलन केवळ नोकरीसाठी नाही, तर सन्मान आणि न्यायासाठी आहे. या बांधवांच्या मागण्या रास्त आणि न्याय्य आहेत.
शासन स्तरावर या प्रश्नाचा ठोस पाठपुरावा करणार असून, संगणक परिचालकांच्या मागण्या मान्य होईपर्यंत त्यांच्यासोबत ठामपणे उभा राहणार आहे.सरकारने तात्काळ सकारात्मक निर्णय घ्यावा, हीच अपेक्षा…
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis