
गडचिरोली., 19 मार्च (हिं.स.)
एकेकाळी माओवाद्यांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यात आता या चळवळीचे अस्तित्व संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे. गुरुवार, १९ मार्च रोजी, गडचिरोली पोलीस दल आणि सीआरपीएफ (CRPF) यांच्या संयुक्त प्रयत्नांना मोठे यश आले असून, ११ जहाल माओवाद्यांनी हिंसेचा मार्ग सोडून लोकशाहीच्या मुख्य प्रवाहात सामील होण्याचा निर्णय घेतला आहे. आत्मसमर्पण केलेल्या या माओवाद्यांवर महाराष्ट्र शासनाने एकूण ६८ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.
आत्मसमर्पण केलेल्यांमध्ये अनेक वरिष्ठ कॅडरच्या सदस्यांचा समावेश आहे, ज्यामुळे नक्षलवादी संघटनांच्या कार्यप्रणालीला मोठा तडा गेला आहे. आत्मसमर्पण केलेल्या माओवाद्यांमध्ये सोनी ऊर्फ बाली वत्ते मट्टामी (DVCM): १६ लाख रुपयांचे बक्षीस (कुतुल दलम), बुदरी ऊर्फ रामबत्ती आयतु मट्टामी (क्षेत्र समिती सचिव): १६ लाख रुपयांचे बक्षीस, सुखलाल बोळगा कोक्सा (कमांडर): ८ लाख रुपयांचे बक्षीस, शांती ऊर्फ सोमरी गंगा तेलामी (PPCM): ८ लाख रुपयांचे बक्षीस, यमुनक्का ऊर्फ रुखमाक्का पेंदाम (ACM): ६ लाख रुपयांचे बक्षीस होते.
विशेष म्हणजे, यमुनक्का पेंदाम हिच्यावर २७ गंभीर गुन्हे दाखल असून ती १९८२ पासून चळवळीत सक्रिय होती. याशिवाय गणेश कोवासी, मिनको मट्टामी, धनु वेळंजे, सुनिता होयाम, रमेश मडावी आणि किशोर वासम या सदस्यांनीही शरणागती पत्करली आहे.
गडचिरोली पोलीस दलाच्या प्रभावी मोहिमांमुळे एकेकाळी जिल्ह्यातील १० उपविभागांत पसरलेली ही चळवळ आता केवळ भामरागड उपविभागाच्या सीमावर्ती भागापुरती मर्यादित राहिली आहे. विशेष म्हणजे १५ ऑक्टोबर २०२५ रोजी पोलीत ब्युरो सदस्य, केंद्रीय समिती सदस्य, प्रवक्ता-सिपीआय माओवादी तसेच सचिव-केंद्रीय रिजनल ब्युरो मल्लोजुला वेनुगोपाल राव ऊर्फ भुपती ऊर्फ सोनू याच्यासह एकूण ६१ माओवाद्यांनी ५४ अग्निशस्त्रांसह मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोर आत्मसमर्पण केल्यामुळे गडचिरोली आणि संपूर्ण दंडकारण्य विभागातील माओवादी चळवळीला मोठा हादरा बसलेला होता. सन २०२५ पासून आतापर्यंत एकूण १२३ माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे, तर आजवरची ही संख्या ७९४ वर पोहोचली आहे.
शासनाच्या आत्मसमर्पण योजनेअंतर्गत या सर्वांना सन्मानाने जगण्यासाठी आर्थिक मदत दिली जाणार आहे. वैयक्तिक मदत: आत्मसमर्पित माओवाद्यांना त्यांच्या पदानुसार ४ ते ८.५ लाख रुपयांपर्यंतचे पुनर्वसन बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. जोडीदारांसाठी अतिरिक्त मदत: सुखलाल कोक्सा-शांती तेलामी आणि गणेश कोवासी-मिनको मट्टामी या पती-पत्नी जोड्यांनी एकत्रित आत्मसमर्पण केल्यामुळे त्यांना अतिरिक्त १.५ लाख रुपयांची मदत मिळेल. गट आत्मसमर्पण: सामूहिकरीत्या शरण आल्यामुळे या गटाला १० लाख रुपयांचे अतिरिक्त बक्षीस दिले जाणार आहे.
“उर्वरित माओवाद्यांनीही हिंसेचा त्याग करून, शस्त्रे खाली ठेवावीत आणि लोकशाहीच्या मुख्य प्रवाहात सामील होऊन शांततेचा मार्ग स्वीकारावा.” असे आवाहन विशेष पोलीस महानिरीक्षक (नक्षलविरोधी अभियान) संदीप पाटील यांनी केले आहे.
याप्रसंगी विशेष पोलीस महानिरीक्षक संदिप पाटील, पोलीस उप-महानिरीक्षक अंकित गोयल, सीआरपीएफचे डीआयजी अजय कुमार शर्मा, पोलीस अधीक्षक नीलोत्पल आणि इतर वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Milind Khond