
मुंबई, 26 मार्च, (हिं.स.)। राज्यसभेची खासदारकी पुन्हा मिळवण्यासाठी काँग्रेसच्या वळचणीला जाऊन बसण्याखेरीज संजय राऊतांकडे पर्याय नाही. संजय राऊत खासदारकीसाठी वाट्टेल ते करण्यासाठी तयार आहेत. उद्धव ठाकरे आपल्याला पुन्हा खासदार करणार नाहीत हे कळून चुकल्याने पूर्वीपासून उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि उबाठा गटाविरोधात पडद्याआडून खेळी रचणारे राऊत आता खुलेआम उबाठा गटाला सोडचिठ्टी देऊन अधिकृतपणे काँग्रेसमध्ये प्रवेश करतील, असा प्रहार भारतीय जनता पार्टीचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी गुरुवारी केला. उबाठा गटातील गटबाजी चव्हाट्यावर आली असून उद्धव ठाकरे विरुद्ध राऊत, आदित्य ठाकरे विरुद्ध राऊत असा सामना रंगतदार होत असून त्याचा आनंद महाराष्ट्रातील जनता घेत असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.
वंदनीय बाळासाहेब ठाकरेंच्या हिंदुत्वाला तिलांजली देत औरंगजेब फॅन क्लब चालवणा-या संजय राऊतांना हिंदुत्वाच्या बाता मारत भारतीय जनता पार्टीवर टीका करण्याचा अधिकार नाही असे श्री. बन यांनी सुनावले. सत्तेसाठी हपापपलेले उद्धव ठाकरे आणि राऊत हिंदुत्व सोडत काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसले. भाजपामुळे नव्हे तर राऊतांमुळे, उद्धव ठाकरेंमुळे हिंदुत्वाचे अध:पतन झाले आहे असा घणाघात त्यांनी केला. राऊतांचे हिंदुत्व बेगडी असून त्यामुळेच मतदारांनी धडा शिकवला आहे असेही ते म्हणाले.
“माझा जन्म शिवसेनेत झाला, जन्मापासून मी शिवसेनेत आहे” असा हास्यास्पद दावा करणा-या राऊतांचा खरपूस समाचार घेत श्री. बन म्हणाले की राऊतांचा हा दावा म्हणजे हास्यजत्रा तील एक प्रहसन आहे. राऊतांचा जन्म शिवसेना वाढवण्यासाठी झाला की, संपवण्यासाठी झाला आहे हे उभ्या महाराष्ट्राने बघितले आहे. शिवसेनेच्या विरोधात राऊतांनी लिहिलेले लेखही महाराष्ट्रातील जनतेच्या अजूनही स्मरणात आहेत. उबाठा गटाला संपवण्याची सुपारी राऊतांनी काँग्रेसकडून घेतली असून उबाठा गट संपूर्णपणे संपवल्याशिवाय त्यांना चैन पडणार नाही असा हल्लाबोलही त्यांनी केला.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर