
मुंबई, 28 मार्च, (हिं.स.)। मराठी चित्रपटसृष्टीत सध्या चर्चेत असलेल्या ‘सुपर डुपर’ चित्रपटातील ‘कुकडू कू’ हे गाणं प्रदर्शित होताच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं आहे. या गाण्याची खास चर्चा रंगतेय, ती लहान गायक अंशुमन कैलास मोरे याच्या आवाजामुळे. पहिल्याच मोठ्या संधीमध्ये अंशुमनने आपल्या सुरांनी अशी छाप सोडली की, त्याचं नाव थेट रसिकांच्या ओठांवर आलं आहे.
जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातल्या विखरण गावातील अंशुमन हा अत्यंत साध्या कुटुंबातून पुढे आलेला मुलगा. सरस्वती माध्यमिक विद्यालयात आठवीत शिकणाऱ्या अंशुमनचे आई-वडील शेतीकाम करून घर चालवतात. घरची परिस्थिती बिकट असली तरी त्याच्या गाण्याची ओढ कधीच कमी झाली नाही. दोन लहान भावांसोबत वाढताना त्याने आपल्या कलेला सातत्याने घडवलं. त्याचा हा संगीताचा प्रवास आधीपासूनच सुरु होता. अंशुमनने 'चार वरिस ना प्यार', 'साजन तू बालम तू', ' सांग ना राणी', 'कोना भरोसे सोडी गई' अशी अहिराणी भाषेत सुमारे ४० ते ५० गाणी गायली आहेत. त्याचं 'राजा मना तू राजा रे' हे गाणं विशेष गाजलं.
'कुकडू कू' हे गाणं अंशुमनसाठी टर्निंग पॉइंट ठरला. महाराष्ट्रभरातून घेतलेल्या शोधातून त्याची निवड झाली आणि या संधीचं त्याने अचूक सोने केलं. लहान वयात मिळालेल्या या मोठ्या ब्रेकमुळे त्याच्या आवाजाची दखल संपूर्ण मराठी चित्रपटसृष्टीने घेतली आहे. पहिल्याच प्रयत्नात त्याने प्रेक्षकांची मनं जिंकली.
या मिळालेल्या संधीबद्दल अंशुमन मोरे म्हणतो, ''झी स्टुडिओजकडून संधी मिळणं हे माझ्यासाठी खूप मोठं स्वप्न पूर्ण झाल्यासारखं आहे. इतक्या मोठ्या कलाकार आणि दिग्दर्शकांसोबत काम करताना खूप काही शिकायला मिळालं. माझ्या गावातून इथपर्यंत पोहोचणं सोपं नव्हतं, परंतु कुटुंबाचा पाठिंबा कायम मिळाला. 'कुकडू कू'ला मिळणारा प्रतिसाद पाहून खूप आनंद होतोय. पुढेही अशीच चांगली गाणी गाण्याची इच्छा आहे.''
‘सुपर डुपर’ या कौटुंबिक चित्रपटात अंशुमनच्या आवाजामुळे वेगळीच ऊर्जा आली आहे. पहिल्याच गाण्यातून त्याने मिळवलेलं यश आणि प्रेक्षकांचा मिळणारा प्रतिसाद पाहाता, अंशुमनच्या पुढील वाटचालीकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
दरम्यान, झी स्टुडिओजची प्रस्तुत, नाईंटी नाईन प्रॉडक्शन्स आणि सिद्धिविनायक प्रॉडक्शन्स निर्मित ‘सुपर डुपर’ हा कौटुंबिक मनोरंजनाचा महासोहळा येत्या ३ एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. समीर आशा पाटील दिग्दर्शित 'सुपर डुपर‘ या चित्रपटाचे विजय शिंदे आणि नरेश बोर्डे निर्माते आहेत. उमेश कुमार बन्सल, बवेश जानवलेकर प्रस्तुतकर्ता असून छायांकन संजय जाधव यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर