
रायगड, 12 एप्रिल (हिं.स.)। डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी आयोजित केला जाणारा दीक्षाभूमीवरील संयुक्त नागरी जयंती सोहळा यंदा होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. स्मारक समितीचे अध्यक्ष भंते सुरई ससाई यांनी परवानगी नाकारल्यामुळे हा निर्णय घ्यावा लागल्याची माहिती आयोजकांनी दिली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त नागरी जयंती समितीचे डॉ. सुचित बागडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, कार्यक्रमासाठी महिनाभरापूर्वीच लेखी अर्ज सादर करण्यात आला होता. मात्र, भंते ससाईंनी अर्ज मिळालाच नसल्याचे सांगत परवानगी नाकारली.
१४ एप्रिल रोजी सायंकाळी ६ ते ९ या वेळेत वैचारिक प्रबोधनपर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यात नाशिकचे विचारवंत निरंजन टकले यांचे ‘डॉ. आंबेडकरांचे विचार आणि वर्तमान भारतातील त्यांची प्रासंगिकता’ तसेच नांदेडचे डॉ. अनंत राऊत यांचे ‘लोकशाही आणि वर्तमान काळातील आव्हाने’ या विषयांवर व्याख्यान होणार होते.
परवानगी मिळावी यासाठी आयोजकांनी मध्यम मार्ग सुचवत दोन तासांचा वेळ देण्याची विनंतीही केली होती. मात्र, तरीही परवानगी नाकारण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. दरम्यान, धर्मगुरूंशी वाद टाळण्यासाठी कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेतला असून पुढील दोन आठवड्यांत नागपूर शहरातील अन्य ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असल्याचे डॉ. बागडे यांनी स्पष्ट केले.
या प्रकरणामुळे सामाजिक वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)