
परभणी, 12 एप्रिल (हिं.स.)।
जिंतूर तालुक्यातील बोरी व चारठाणा येथील ग्रामस्थांनी शुक्रवारी अप्पर तहसील कार्यालय स्थापने संदर्भात आयोजित केलेल्या बैठकीत आपआपल्या गावांचा आग्रह धरला.
परभणी जिल्ह्यात सुधारित आकृतीबंधात जिंतुर तालुक्यातील बोरी / चारठाणा अपर तहसील कार्यालय निर्माण करण्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली.
बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, सेलूचे उपविभागीय अधिकारी शैलेश लाहोटी, जिंतूर तहसिलदार शितल कच्छवे आदींसह जिंतुर तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच तथा प्रशासक ग्रामपंचायत कार्यालय, नागरिक उपस्थित होते.
जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी उपस्थित मान्यवर व नागरिकांचे अभिप्राय संयमाने ऐकून घेतले. त्यांनी नमूद केले की, प्रस्तावित निर्णय घेताना स्थानिक नागरिकांची सोय, आवश्यकता तसेच सर्व संबंधित घटकांच्या भावना यांचा विचार करण्यात येईल. तसेच बैठकीत मांडण्यात आलेल्या सर्व मागण्या शासनास सादर करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
प्रारंभी अपर तहसील कार्यालय कुठे स्थापन करावे, याबाबत उपस्थित नागरिक आणि लोकप्रतिनिधींनी आपापली मते मांडली. काहींनी बोरी येथे कार्यालय व्हावे, तर काहींनी चारठाणा येथे व्हावे, अशी मागणी केली. यामुळे या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis