
रायगड, 12 एप्रिल (हिं.स.)। कोकण मराठी साहित्य परिषद (कोमसाप) म्हसळा शाखेच्या वतीने केशवराव खांबेटे सार्वजनिक वाचनालयात कवी जितेंद्र मांजरेकर लिखित “पंख मायेचे” या काव्यसंग्रहाच्या प्रकाशन सोहळ्यासह “कृत्रिम बुद्धिमत्तेला धोका आहे काय?” या विषयावरील परिसंवाद उत्साहात पार पडला. साहित्यप्रेमींच्या मोठ्या उपस्थितीत हा कार्यक्रम प्रेरणादायी ठरला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक व कोमसाप विश्वस्त एल. बी. पाटील होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी “मानवता हाच खरा धर्म असून सृजनता प्रत्येकाच्या मनात असणे गरजेचे आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता ही मानवी बुद्धीची निर्मिती असून तिचा योग्य वापर सृजनतेसोबत केल्यास बौद्धिक क्षमतेत वाढ होऊ शकते,” असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमास रायगड कोमसाप अध्यक्ष संजय गुंजाळ, वाचनालय अध्यक्ष संजय खांबेटे, जिल्हा प्रतिनिधी गणेश कोळी, उपाध्यक्ष पुरुषोत्तम मुळे, उरण शाखा अध्यक्ष मच्छिंद्र म्हात्रे आदी मान्यवर उपस्थित होते. परिसंवादाचे अध्यक्ष डॉ. देविदास बामणे होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)