
नाशिक, 13 एप्रिल (हिं.स.) : नाशिकमध्ये भाजयुमोने केलेले आंदोलन हे कोणत्याही औद्योगिक क्षेत्राविरोधात नसून, केवळ अपप्रवृत्ती आणि गैरप्रकारांविरोधात होते, असे भाजप शहराध्यक्ष सुनील केदार यांनी स्पष्ट केले आहे.
शहरात एका आयटी कंपनीत मुलींवर अत्याचार, धर्मांतरासाठी दबाव, गोमांस खाण्यास भाग पाडणे, हिंदू देव-देवतांविषयी अपमानास्पद भाषा, ब्लॅकमेलिंग आणि दादागिरी असे गंभीर प्रकार सुरू असल्याचे आरोप करण्यात आले आहेत. याप्रकरणी एका मुलीने आणि तिच्या पालकांनी धाडस दाखवून पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर अनेक घटना समोर येत असल्याचे सांगण्यात आले.
पूर्वी दहशतीमुळे कोणी तक्रार करण्यास पुढे येत नव्हते, मात्र आता काही माजी कर्मचारीही पुढे येऊन तक्रारी देत असल्याने प्रकरणाचे गांभीर्य वाढल्याचे म्हटले जात आहे.
या पार्श्वभूमीवर भाजयुमोचे आंदोलन हे संबंधित आयटी कंपनीविरोधात नसून गैरप्रकार करणाऱ्या घटकांविरोधात होते, असे सुनील केदार यांनी स्पष्ट केले. त्यांनी औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यांना घाबरून न जाता काम सुरू ठेवण्याचे आवाहन केले.
तसेच अशा प्रकारच्या धमक्या, खंडणी किंवा गैरप्रकार होत असल्यास नागरिकांनी थेट पोलिसांकडे किंवा भाजप कार्यालयात संपर्क साधावा, असेही त्यांनी सांगितले.
नाशिक जिल्हा हा कायद्याचा बालेकिल्ला असून कोणीही अफवा पसरवू नये, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
----------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV