
बीड, 13 एप्रिल (हिं.स.)।
मराठा आंदोलकांवरील सर्व गुन्हे मागे घेण्याच्या आश्वासनावरून मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला निर्वाणीचा इशारा दिला आहे. सरकारने दिलेला शब्द पाळला नाही तर पुन्हा एकदा सर्वात मोठे आंदोलन उभारून गुन्हे मागे घेण्यास भाग पाडू, असे त्यांनी ठामपणे सांगितले.
सद्यस्थितीत ६० ते ६२ गुन्हे न्यायप्रविष्ट असून ८० गुन्ह्यांबाबत विभागीय समितीचा अहवाल येणे अद्याप प्रलंबित आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शब्दापासून फिरण्याचा प्रयत्न केला तरी आपण आपला पवित्रा बदलणार नाही, असा इशारा देतानाच जरांगे यांनी मराठा उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर कडाडून टीका केली. उपसमिती मराठा समाजाला न्याय देण्याऐवजी त्यांची थट्टा करत असून, मराठ्यांमध्येच फूट पाडण्याचे काम सुरू असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. सारथी, आरोग्य विभाग आणि ईबीसी सवलतींच्या प्रश्नावर सरकारने तातडीने तोडगा काढावा, अशी मागणी करत ओबीसींप्रमाणेच सर्व योजना मराठ्यांना लागू कराव्यात, असे त्यांनी स्पष्ट केले.
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis