
रत्नागिरी, 13 एप्रिल, (हिं. स.) : काँग्रेस पक्ष संघटनेत आता जिल्हाध्यक्ष निवडीची वरिष्ठांकडून थेट नियुक्त्ती पद्धत आता इतिहासजमा होणार आहे. पक्षनेते राहुल गांधी यांच्या नवीन संकल्पनेनुसार आता नेत्याच्या शिफारशीपेक्षा कार्यकर्त्यांच्या पसंतीला महत्त्व दिले जाणार आहे. रत्नागिरीतील पत्रकार परिषदेत हे स्पष्ट करण्यात आले.
रत्नागिरी जिल्ह्यासाठी उत्तर आणि दक्षिण अशा दोन जिल्हाध्यक्षांची निवड थेट कार्यकर्त्यांमधून केली जाईल, अशी माहिती काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव दानिश अब्रार यांनी यावेळी दिली. आतापर्यंत जिल्हाध्यक्षांची निवड वरिष्ठ पातळीवरून थेट केली जात असे. मात्र राहुल गांधी यांच्या सूचनेनुसार ही पद्धत बदलण्यात आली आहे. दानिश अब्रार यांनी स्पष्ट केले की, काँग्रेसला केवळ खुर्च्या उचलणारा किंवा झेंडे लावणारा कार्यकर्ता नको आहे, तर लोकांच्या सुखदुःखात धावून जाणारा खंबीर कार्यकर्ता हवा आहे. कार्यकर्ताच आता आपला नेता निवडणार आहे.
जिल्हाध्यक्ष पदासाठीची प्रक्रिया अत्यंत पारदर्शक आणि वेगवान पद्धतीने राबवली जाणार आहे. एप्रिलपर्यंत जिल्ह्यातील इच्छुक नेते आणि कार्यकर्त्यांकडून अर्ज स्वीकारले जातील. येत्या २० एप्रिलपर्यंत राज्यभरात कार्यकर्त्यांशी संवाद साधून मते जाणून घेतली जातील. मे महिन्याच्या अखेरीस किंवा पुढील दीड महिन्यात नवीन जिल्हाध्यक्षांची घोषणा केली जाईल.
या पदासाठी पक्षाचा कोणताही निष्ठावान कार्यकर्ता किंवा नेता आपला अर्ज भरू शकणार आहे. कार्यकर्ता हा केवळ खटले अंगावर घेण्यासाठी नसून, त्याला सत्तेत आणि निर्णयप्रक्रियेत स्थान मिळणे आवश्यक आहे. ही नवी प्रक्रिया कार्यकर्त्यांना बळ देणारी ठरेल, असेही ते म्हणाले.
रत्नागिरी जिल्ह्याचा भौगोलिक विस्तार विचारात घेता, पक्ष संघटनेला बळकटी देण्यासाठी जिल्ह्याचे दोन भाग करण्यात आले आहेत. त्यानुसार उत्तर रत्नागिरी आणि दक्षिण रत्नागिरी अशा दोन जिल्हाध्यक्षांची निवड केली जाणार आहे. सचिव अब्रार स्वतः कार्यकर्त्यांशी चर्चा करून मिळणारी माहिती आणि आलेले अर्ज पक्षश्रेष्ठींकडे सुपूर्द करणार आहेत.
पत्रकार परिषदेला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रमेश कीर, नगराध्यक्षा हुस्नबानू खलिपे, जिल्ह्याचे विद्यमान दोन्ही जिल्हाध्यक्ष, तसेच मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी