
लातूर, 14 एप्रिल (हिं.स.)। डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त टाऊन हॉल लातूर येथे आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सामाजिक जाणीव व मानवतेचा संदेश देणाऱ्या या उपक्रमामध्ये स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस अंमलदारांनी पुढाकार घेत रक्तदान करून एक आदर्श निर्माण केला आहे.स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व अंमलदार यांनी आपल्या दैनंदिन कर्तव्याच्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून स्वेच्छेने रक्तदान केले. त्यांच्या या कृतीतून “सेवा हीच खरी ओळख” हा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचला.
पोलीस दल हे केवळ कायदा व सुव्यवस्था राखणारी यंत्रणा नसून, समाजाच्या प्रत्येक गरजेला प्रतिसाद देणारी संवेदनशील संस्था आहे, हे या उपक्रमातून स्पष्ट झाले. अनेकदा आपत्कालीन परिस्थितीत रक्ताच्या तुटवड्यामुळे रुग्णांना जीव गमवावा लागतो. अशा परिस्थितीत पोलीस अंमलदारांनी पुढाकार घेऊन रक्तदान करणे ही अत्यंत स्तुत्य बाब असून, त्यामुळे अनेक गरजू रुग्णांना नवजीवन मिळण्यास मदत होणार आहे.
या रक्तदान शिबिरामध्ये स्थानिक गुन्हे शाखेच्या अंमलदारांसह अनेक नागरिक, स्वयंसेवक व विविध संघटनांनी सहभाग घेतला.स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस अंमलदारांनी दाखविलेली सामाजिक बांधिलकी, कर्तव्यनिष्ठा व सेवाभाव यामुळे समाजात पोलीस दलाबद्दलचा विश्वास अधिक दृढ होण्यास अधिक मदत होणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis