
रायगड, 14 एप्रिल (हिं.स.) : कर्जत तालुक्यातील नेरळ परिसरातील मोहाची वाडी, शनी मंदिर शेजारील ग्रामपंचायत हद्दीत जमीन व्यवहार आणि अपूर्ण बांधकामाशी संबंधित गंभीर आणि कायदेशीर दृष्ट्या गुंतागुंतीचे प्रकरण समोर आले आहे.
मौजे सर्वे क्रमांक 291, 292, 293 आणि 294 मधील सुमारे 58 गुंठे जमिनीवर 2015 साली संजय महेंद्र गुप्ता आणि अर्चना संजय गुप्ता यांनी विकास प्रकल्प सुरू केल्याची माहिती आहे. मात्र स्थानिकांच्या म्हणण्यानुसार ही जमीन गजानन आंबो डबरे या शेतकऱ्याच्या कुटुंबाची असून कोणताही अधिकृत करार न करता विकासकाम सुरू केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
याच ठिकाणी इमारत उभारणीदरम्यान सुमारे 93 नागरिकांकडून फ्लॅट बुकिंग घेण्यात आल्याचे समोर आले आहे. मात्र कोणतेही स्पष्ट कारण न देता हे बांधकाम अचानक थांबवण्यात आले असून प्रकल्प अद्याप अपूर्ण अवस्थेत आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांची आर्थिक फसवणूक झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, गजानन डबरे यांचे पुत्र जगदीश गजानन डबरे यांनी या प्रकरणात आपल्यावर खोट्या तक्रारी दाखल करण्यात आल्याचा आरोप केला आहे. तसेच जमीन व्यवहार, बांधकाम परवानग्या आणि बुकिंग प्रक्रियेची सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली आहे.
या प्रकरणात संजय महेंद्र गुप्ता यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा मोबाईल बंद आढळून आला. तसेच त्यांच्या वकिलांशी संपर्क साधण्याचे प्रयत्नही अपयशी ठरले.
स्थानिक नागरिकांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली असून, अपूर्ण प्रकल्प पूर्ण करण्यासाठी संबंधितांनी पुढाकार घ्यावा, अशीही मागणी करण्यात आली आहे.
--------------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)