होर्मुज तणावात दिलासा : ‘जग विक्रम’ एलपीजी जहाज सुरक्षित कांडला बंदरात दाखल
नवी दिल्ली, 15 एप्रिल (हिं.स.)। होर्मुज सामुद्रधुनीत सुरू असलेल्या अमेरिकेच्या नाकेबंदीच्या पार्श्वभूमीवर भारतीय एलपीजी जहाज ‘जग विक्रम’ भारतात पोहोचण्यात यशस्वी ठरला आहे. २०,४०० मेट्रिक टन एलपीजी घेऊन हे जहाज बुधवार, १५ एप्रिल रोजी गुजरातमधील कांड
Jag Vikram  LPG Tanker Safely Arrives at Kandla Port


नवी दिल्ली, 15 एप्रिल (हिं.स.)। होर्मुज सामुद्रधुनीत सुरू असलेल्या अमेरिकेच्या नाकेबंदीच्या पार्श्वभूमीवर भारतीय एलपीजी जहाज ‘जग विक्रम’ भारतात पोहोचण्यात यशस्वी ठरला आहे. २०,४०० मेट्रिक टन एलपीजी घेऊन हे जहाज बुधवार, १५ एप्रिल रोजी गुजरातमधील कांडला बंदरात पोहोचले. अमेरिका आणि इराण यांच्यात दोन आठवड्यांच्या तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा झाल्यानंतर होर्मुज सामुद्रधुनी पार करणारे हे पहिले भारतीय जहाज ठरले आहे.

एलपीजी जहाज ‘जग विक्रम’ ११ एप्रिल रोजी होर्मुज सामुद्रधुनी पार करण्यात यशस्वी झाले होते. मार्चच्या सुरुवातीपासून आतापर्यंत होर्मुजच्या पश्चिम भागातून बाहेर पडणारे हे भारताचे नववे जहाज आहे. पश्चिम आशियात तणाव सुरू होण्यापूर्वी होर्मुज सामुद्रधुनीच्या परिसरात २८ भारतीय जहाजे उपस्थित होती. यापैकी २४ जहाजे पश्चिम भागात होती, तर चार जहाजे पूर्व भागात अडकलेली होती.

इराण आणि अमेरिका यांच्यात दोन आठवड्यांच्या तात्पुरत्या युद्धविरामाच्या आधी होर्मुजच्या पश्चिम भागातून भारताची आठ जहाजे यशस्वीरित्या बाहेर पडली होती. त्याचप्रमाणे पूर्व भागातूनही दोन भारतीय जहाजे सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले होते. आता एलपीजी टँकर ‘जग विक्रम’ देखील होर्मुजच्या पश्चिम भागातून बाहेर काढून सुरक्षितपणे भारतात पोहोचला आहे. मात्र, अजूनही अनेक भारतीय जहाजे होर्मुज सामुद्रधुनीच्या परिसरात अडकलेली आहेत. तसेच मोठ्या संख्येने विदेशी जहाजेही पर्शियन आखातात अडकून पडली असून होर्मुज सामुद्रधुनी पुन्हा पूर्ववत सुरू होण्याची वाट पाहत आहेत.

उल्लेखनीय आहे की भारत पेट्रोलियम उत्पादनांच्या गरजांसाठी मोठ्या प्रमाणावर आयातीवर अवलंबून आहे. भारत आपल्या गरजेपैकी सुमारे ८८ टक्के कच्चे तेल आंतरराष्ट्रीय बाजारातून आयात करतो. त्याचप्रमाणे देशाच्या गरजेपैकी सुमारे ५० टक्के नैसर्गिक वायू आणि जवळपास ६० टक्के एलपीजी देखील आयात केली जाते. खाडी देशांतून येणाऱ्या कच्च्या तेल आणि वायूचा बहुतांश पुरवठा होर्मुज सामुद्रधुनीमार्गेच होतो. मात्र पश्चिम आशियात युद्ध सुरू झाल्यापासून हा मार्ग जवळपास ठप्प झाला आहे. यामुळे भारतातील एलपीजी पुरवठ्यावरही मोठा परिणाम झाला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande