मुंबईत भोंदू फकीर अटकेत; उपचाराच्या नावाखाली महिलांवर अत्याचाराचा आरोप
मुंबई, 20 एप्रिल (हिं.स.)। नाशिक आणि संगमनेरमधील भोंदूबाबांच्या प्रकरणांची चर्चा अजून थंड झालेली नसतानाच मुंबईतही अशाच प्रकारचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. स्वतःला फकीर बाबा म्हणवून महिलांची फसवणूक करणाऱ्या एका भोंदू फकीराला पोलिसांनी अटक केली आ
Fraudulent  Fakir Arrested in Mumbai


मुंबई, 20 एप्रिल (हिं.स.)। नाशिक आणि संगमनेरमधील भोंदूबाबांच्या प्रकरणांची चर्चा अजून थंड झालेली नसतानाच मुंबईतही अशाच प्रकारचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. स्वतःला फकीर बाबा म्हणवून महिलांची फसवणूक करणाऱ्या एका भोंदू फकीराला पोलिसांनी अटक केली आहे. महिलांना त्यांच्या वैयक्तिक समस्या आणि दुःखावर उपाय सांगण्याच्या नावाखाली जाळ्यात ओढून त्यांना बेशुद्ध करून अत्याचार केल्याचा गंभीर आरोप या आरोपीवर करण्यात आला आहे. या प्रकरणातील आरोपीचे नाव इरफान नियाज अहमद (वय ३४) असून तो मूळचा उत्तर प्रदेशातील बहराइच येथील रहिवासी आहे.

मात्र, गेल्या काही वर्षांपासून तो मुंबईत वास्तव्यास होता. कांदिवली परिसरात स्वतःला फकीर बाबा म्हणून ओळख निर्माण करून लोकांचा विश्वास संपादन करत होता. विशेषतः महिलांच्या अडचणी जाणून घेऊन त्यावर धार्मिक विधी आणि उपचार करण्याचे आमिष दाखवत तो त्यांना फसवत असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.

कांदिवलीत राहणाऱ्या एका महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपीने तिच्या पतीच्या मृत्यूबाबत अचूक माहिती सांगून तिचा विश्वास जिंकला. त्यानंतर तिच्यावर काही दोष असल्याचे सांगत तो दोष दूर करण्यासाठी विशेष विधी करण्याची गरज असल्याचे सांगितले. या बहाण्याने आरोपीने त्या महिलेला आणि तिच्या दोन मुलींना एका ठिकाणी बोलावून धार्मिक विधी सुरू केला. या विधीदरम्यान तिघींनाही बेशुद्ध करण्यात आले, असा आरोप करण्यात आला आहे.

बेशुद्ध अवस्थेचा फायदा घेत आरोपीने एका मुलीचा विनयभंग केल्याचा अत्यंत गंभीर प्रकार समोर आला आहे. ही घटना उघडकीस आल्यानंतर संबंधित महिलेनं तात्काळ कांदिवली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (बीएनएस) अंतर्गत कलम ७४, ७८, १२३ तसेच ३(२) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपी इरफान नियाज अहमद याला अटक केली असून त्याची कसून चौकशी सुरू आहे. या प्रकरणामागे आणखी काही पीडित महिला असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली असून अधिक तपास सुरू आहे. आरोपीने अशा प्रकारे किती जणांना फसवले आहे, याचा शोध घेतला जात आहे.

या घटनेमुळे मुंबईत एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. धार्मिक श्रद्धा आणि अंधविश्वासाचा गैरफायदा घेऊन महिलांची फसवणूक करणाऱ्या अशा भोंदूबाबांविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. पोलिसांनी नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन केले असून अशा प्रकारच्या व्यक्तींवर सहज विश्वास ठेवू नये, असेही सांगितले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande