भारतीय ॲथलेटिक्ससाठी धोक्याची घंटा: भारताचा समावेश 'अत्युच्च जोखीम' असलेल्या डोपिंग गटात
नवी दिल्ली, 20 एप्रिल (हिं.स.)''वर्ल्ड ॲथलेटिक्स''च्या ''ॲथलेटिक्स इंटिग्रिटी युनिट''ने (AIU) भारताचा आंतरराष्ट्रीय ॲथलेटिक्समधील डोपिंगच्या संदर्भातील ''श्रेणी अ'' (Category A) मध्ये—म्हणजेच सर्वाधिक धोक्याच्या गटात अधिकृतपणे समावेश केला
भारतीय ॲथलेटिक्स क्षेत्रावर डोपिंगचे काळे ढग कायम


नवी दिल्ली, 20 एप्रिल (हिं.स.)'वर्ल्ड ॲथलेटिक्स'च्या 'ॲथलेटिक्स इंटिग्रिटी युनिट'ने (AIU) भारताचा आंतरराष्ट्रीय ॲथलेटिक्समधील डोपिंगच्या संदर्भातील 'श्रेणी अ' (Category A) मध्ये—म्हणजेच सर्वाधिक धोक्याच्या गटात अधिकृतपणे समावेश केला आहे. २० एप्रिल २०२६ पासून लागू होणारा हा निर्णय, AIU ने वर्णन केल्यानुसार, डोपिंगचा धोका सातत्याने अत्यंत उच्च पातळीवर असल्याचे आणि या समस्येच्या व्याप्तीशी जुळवून घेण्यात देशांतर्गत डोपिंग-विरोधी कार्यक्रम अपयशी ठरल्याचे निरीक्षण नोंदवल्यानंतर घेण्यात आला आहे.

ॲथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडियाला (AFI) श्रेणी 'बी' मधून श्रेणी 'ए' मध्ये स्थान मिळाल्यानंतर, ते आता रशिया, बेलारूस, इथिओपिया, केनिया, नायजेरिया आणि युक्रेन यांसारख्या देशांच्या पंक्तीत सामील झाले आहे. श्रेणी 'ए' चा अर्थ असा आहे की, भारतीय खेळाडूंना आता अधिक कठोर डोपिंग-विरोधी नियमांचे पालन करावे लागणार आहे.

२०२२ ते २०२५ दरम्यान ॲथलेटिक्समधील सर्वाधिक डोपिंग-विरोधी उल्लंघनांमध्ये जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश पहिल्या दोन क्रमांकांमध्ये आहे, असे एआययूने म्हटले आहे.

भारतातील डोपिंगची परिस्थिती बऱ्याच काळापासून उच्च-जोखमीची आहे आणि दुर्दैवाने, देशांतर्गत डोपिंग-विरोधी कार्यक्रमाची गुणवत्ता डोपिंगच्या जोखमीच्या प्रमाणात नाही, असे एआययूचे अध्यक्ष डेव्हिड हॉमन म्हणाले. एएफआयने भारतात डोपिंग-विरोधी सुधारणांसाठी पाठपुरावा केला असला तरी, पुरेसा बदल झालेला नाही. आम्ही इतर 'अ' श्रेणीतील सदस्य महासंघांसोबत जसे केले आहे, त्याचप्रमाणे एआययू आता ॲथलेटिक्स खेळाची अखंडता जपण्यासाठी सुधारणा घडवून आणण्याकरिता एएफआयसोबत काम करेल. एआययू ही ॲथलेटिक्समधील भ्रष्टाचार आणि डोपिंगसह गैरप्रकारांविरुद्ध लढण्याचे काम करणारी एक स्वतंत्र संस्था आहे.

भारत २०३० च्या राष्ट्रकुल खेळांचे आयोजन करण्यास सज्ज आहे, जे २०३६ च्या ऑलिम्पिक खेळांच्या आयोजनाच्या महत्त्वाकांक्षेसाठी एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.

जागतिक उत्तेजक द्रव्य विरोधी संस्थेचे (वाडा) प्रमुख विटॉल्ड बांका गेल्या आठवड्यात नवी दिल्लीत होते आणि म्हणाले की, भारत हा कामगिरी सुधारणाऱ्या उत्तेजक द्रव्यांचा सर्वात मोठा उत्पादक आहे.

त्यांनी नमूद केले की, उत्तेजक द्रव्य सेवन करणाऱ्यांच्या यादीत भारत सातत्याने अग्रस्थानी असला तरी, त्यामुळे प्रतिष्ठित जागतिक क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्याच्या त्याच्या संधींना कोणताही अडथळा येणार नाही.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande