
नवी दिल्ली , 22 एप्रिल (हिं.स.)।दिल्लीत पडत असलेल्या भीषण उष्णतेच्या लाटेच्या पार्श्वभूमीवर दिल्ली सरकारने सरकारी तसेच सर्व खासगी शाळांसाठी नवी मार्गदर्शक सूचना जारी केली आहे. याअंतर्गत सरकारने शाळांना अनेक दिशा-निर्देश दिले आहेत. त्यापैकी एक महत्त्वाचा निर्देश म्हणजे शाळांमध्ये दर तासाला ‘वॉटर बेल’ वाजवण्याचा आहे. यानुसार शाळांमध्ये प्रत्येक ४५ ते ६० मिनिटांनी घंटा वाजवली जाईल, ज्यामुळे विद्यार्थ्यांना पाणी पिण्याची आठवण करून दिली जाईल आणि त्यांना निर्जलीकरणाचा त्रास होऊ नये.
शाळांना ‘बडी सिस्टीम’ लागू करण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत. यामध्ये दोन विद्यार्थ्यांना एकमेकांची जबाबदारी देण्यात येईल, जेणेकरून ते एकमेकांच्या आरोग्याकडे लक्ष ठेवू शकतील आणि काही अडचण जाणवल्यास तात्काळ शिक्षकांना माहिती देऊ शकतील.मंगळवारी जारी करण्यात आलेल्या परिपत्रकात बाहेरील प्रार्थनासभा लहान ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. शक्य असल्यास प्रार्थनासभा बंदिस्त जागेत किंवा सावलीच्या ठिकाणी घेण्यास सांगितले आहे. तसेच उघड्यावर होणाऱ्या सर्व उपक्रमांवर उष्णतेच्या लाटेदरम्यान बंदी घालण्यात आली आहे.
शिक्षण संचालनालयाने शाळांना स्वच्छ आणि थंड पाण्याची व्यवस्था करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच विद्यार्थ्यांनी घरून पाण्याची बाटली आणणे अनिवार्य करण्यात आले आहे.बाहेरील उपक्रम बंद करून शाळांना लूपासून बचावासाठी छोटे-छोटे जनजागृती सत्र आयोजित करण्यास सांगण्यात आले आहे, ज्यामुळे विद्यार्थ्यांना उष्माघातापासून संरक्षणाचे उपाय समजू शकतील.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode