
कोपनहेगन, २८ एप्रिल (हिं.स.)डेन्मार्कच्या हॉर्सेन्स येथे सुरू असलेल्या उबर कप फायनल्समध्ये चीनकडून ०-५ असा पराभव झाल्याने भारतीय महिला बॅडमिंटन संघाचे आव्हान संपुष्टात आले. दोन वेळची ऑलिम्पिक पदक विजेती पीव्ही सिंधू मजबूत स्थितीत असूनही सामना हरली, ज्यामुळे भारताच्या पुनरागमनाच्या आशा संपुष्टात आल्या.
भारतीय संघाने आपल्या मोहिमेची सुरुवात यजमान डेन्मार्ककडून २-३ अशा पराभवाने केली, पण त्यानंतर युक्रेनवर ४-१ असा विजय मिळवून आशा पल्लवित केल्या. तथापि, संघाला १६ वेळच्या चॅम्पियन चीनविरुद्ध कठीण आव्हानाला सामोरे जावे लागले.
सिंधूच्या पराभवामुळे भारताचे मनोधैर्य खचले. पहिल्या एकेरी सामन्यात पीव्ही सिंधूने जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या वांग झी यी विरुद्ध जोरदार सुरुवात केली. निर्णायक गेममध्ये १८-१२ अशी आघाडी घेऊनही, सिंधूला सामना जिंकता आला नाही आणि ती १६-२१, २१-१९, १९-२१ अशा फरकाने हरली. या पराभवामुळे चीनला १-० अशी आघाडी मिळाली.
पहिल्या दुहेरी सामन्यात, प्रिया कोन्जेंगबाम आणि श्रुती मिश्रा या जोडीला जागतिक क्रमवारीत अव्वल असलेल्या लिऊ शेंग शू आणि टॅन निंग यांच्याकडून ११-२१, ८-२१ असा पराभव पत्करावा लागला.
दुसऱ्या एकेरी सामन्यात, इशारानी बरुआने टोकियो ऑलिम्पिक चॅम्पियन चेन युफेईला कडवी झुंज दिली, परंतु महत्त्वाच्या संधी गमावल्यामुळे तिला २२-२०, २१-१३ असा पराभव पत्करावा लागला, ज्यामुळे चीनला ३-० अशी अभेद्य आघाडी मिळाली.
दुसऱ्या दुहेरी सामन्यात, ट्रीसा जॉली आणि कविप्रिया सेल्वम यांनी कडवी झुंज दिली, परंतु त्यांना लुओ शू मिन आणि झांग शू शियान यांच्याकडून १०-२१, २१-१२, १९-२१ असा पराभव पत्करावा लागला.
तिसऱ्या एकेरीच्या सामन्यात देविका सिहागने चांगली सुरुवात केली, पण तिला तो वेग टिकवता आला नाही आणि ती शू वेन जिंगकडून २१-१९, १७-२१, १०-२१ ने पराभूत झाली.
थॉमस कपमध्ये चीनचा सामना करणाऱ्या भारतीय पुरुष संघावर आता सर्वांच्या नजरा असतील. २०२२ च्या विजेत्या भारताने, 'अ' गटातील सामन्यात ऑस्ट्रेलियाला ५-० ने पराभूत करून उपांत्यपूर्व फेरीत आपले स्थान निश्चित केले आहे.भारत आणि चीन दोन्ही संघ आपापल्या गटात अव्वल स्थानी आहेत आणि बुधवारचा सामना गटविजेता ठरवणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे