श्रीवर्धन ते कान... मापुस्कर ब्रदर्सच्या 'एप्रिल मे ९९'ची आंतरराष्ट्रीय झेप
मुंबई, 29 एप्रिल, (हिं.स.)। मराठी चित्रपटसृष्टीसाठी अभिमानाचा आणि तितकाच भावनिक क्षण घेऊन एक आनंदाची बातमी समोर आली आहे. दिग्दर्शक रोहन मापुस्कर यांच्या ‘एप्रिल मे ९९’ या चित्रपटाची प्रतिष्ठित कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील फिल्म बाजार विभाग
'April May 99


मुंबई, 29 एप्रिल, (हिं.स.)। मराठी चित्रपटसृष्टीसाठी अभिमानाचा आणि तितकाच भावनिक क्षण घेऊन एक आनंदाची बातमी समोर आली आहे. दिग्दर्शक रोहन मापुस्कर यांच्या ‘एप्रिल मे ९९’ या चित्रपटाची प्रतिष्ठित कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील फिल्म बाजार विभागासाठी निवड झाली आहे. एका साध्या, मनाला भिडणाऱ्या कथेनं थेट जागतिक व्यासपीठ गाठलं आहे, हेच या यशाचं खास वैशिष्ट्य आहे.

‘एप्रिल मे ९९’ हा फक्त चित्रपट म्हणजे आपल्यापैकी प्रत्येकाने कधी ना कधी जगलेला काळ आहे. उन्हाळ्याच्या सुट्ट्या, मित्रांसोबतचे निखळ क्षण, पहिल्यांदाच मनात डोकावलेली ती कोवळी भावना… सगळंच या कथेत हळुवारपणे उमटलं आहे. हा चित्रपट पाहाताना प्रेक्षक फक्त कथा बघत नाहीत, तर स्वतःच्या आठवणींमध्ये हरवून जातात. म्हणूनच ही कथा कुठल्याही भाषेच्या चौकटीत न अडकता, थेट मनाशी संवाद साधते.

या चित्रपटामागे उभे असलेले मापुस्कर ब्रदर्स यांनी ही कथा केवळ सांगितली नाही, तर ती मनापासून जगली आहे. विशेष म्हणजे, अमराठी निर्मात्यांनी दिलेला मोठा पाठिंबा या प्रवासात खूप महत्त्वाचा ठरला. भाषेच्या पलीकडे जाऊन एका मराठी कथेला दिलेली साथ ही केवळ साथ नाही, तर विश्वासाची खूण आहे. म्हणूनच ‘एप्रिल मे ९९’ हा चित्रपट अधिक जवळचा, अधिक आपलासा वाटतो.

निर्माते राजेश मापुस्कर, मधुकर कोटीयन, जोगेश भूटानी आणि मॉरिस नून, तसेच सहनिर्माते लॉरेन्स डिसोझा यांनी या कथेला दिलेलं पाठबळ स्पष्ट जाणवतं. प्रत्येकाने या चित्रपटाकडे केवळ एक प्रोजेक्ट म्हणून नाही, तर एक जपलेली आठवण म्हणून पाहिलं आणि म्हणूनच ही कथा इतकी जिवंत झाली आहे.

या यशाबद्दल रोहन मापुस्कर म्हणतात, '' 'एप्रिल मे ९९' माझ्यासाठी माझ्या आणि आपल्या सगळ्यांच्या आयुष्यातल्या त्या साध्या तरीही खूप खास क्षणांची गोष्ट आहे. आपण मोठे होताना नकळत मागे सोडून आलेल्या आठवणी - मित्रांसोबतचे दिवस, पहिलं प्रेम, आणि काही न बोलताही खूप काही सांगणारे क्षण हे सगळं या कथेत जपण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. कानसारख्या व्यासपीठावर या कथेला स्थान मिळणं म्हणजे आमच्यासाठी केवळ सन्मान नाही, तर त्या आठवणींना जगभर पोहोचवण्याची एक सुंदर संधी आहे. मला वाटतं, जगात कुठेही असो, प्रत्येकाला आपल्या बालपणाशी, त्या निरागस काळाशी एक नातं असतंच. ‘एप्रिल मे ९९’ त्या नात्याला पुन्हा एकदा हलकेच स्पर्श करेल, अशी आशा आहे.''

कान फिल्म बाजार विभागात निवड होणं म्हणजे या चित्रपटासाठी एक मोठं दार उघडल्यासारखं आहे. इथून पुढे ‘एप्रिल मे ९९’ जगभरातील प्रेक्षक, वितरक आणि निर्मात्यांपर्यंत पोहोचेल. त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे ही कथा आता विविध संस्कृतींमध्ये, विविध देशांमध्ये, वेगवेगळ्या लोकांच्या मनात आपली जागा निर्माण करेल.

‘एप्रिल मे ९९’चं हे यश म्हणजे आठवणींवर, भावनांवर आणि साधेपणावर असलेल्या विश्वासाचं यश आहे. एक हळुवार, प्रामाणिक कथा जेव्हा मनापासून सांगितली जाते, तेव्हा ती कुठल्याही सीमांना ओलांडू शकते, याचं हे सुंदर उदाहरण आहे. आता ही कथा जगभर झळकणार आहे… आणि प्रत्येकाला स्वतःच्या आयुष्यातल्या ‘एप्रिल’ आणि ‘मे’च्या दिवसांत पुन्हा एकदा घेऊन जाणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande