
परभणी, 30 एप्रिल (हिं.स.)।
अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई तात्काळ शेतकर्यांच्या बँक खात्यात जमा करावी, यंदाच्या नुकसानग्रस्त पिकांच्या विम्याची आगाऊ रक्कम त्वरित अदा करावी तसेच 2021 मधील नुकसानीची उर्वरित विमा रक्कम लवकरात लवकर वितरित करावी, अशी मागणी बळीराजा संघर्ष समितीने सेलू तहसीलदारांना सादर केलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
2024 मधील पावसाळ्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे परभणी जिल्ह्यासह सेलू तालुक्यात शेतातील उभ्या पिकांसह पशुधन आणि शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. आधीच प्रचंड महागाई, शेतीमालाला मिळणारा कमी दर, खते व बियाण्यांच्या वाढलेल्या किंमती तसेच बेरोजगारी यामुळे त्रस्त असलेल्या शेतकरी व शेतमजुरांना 31 ऑगस्ट व 1 सप्टेंबर 2024 रोजी झालेल्या अतिवृष्टीने मोठा फटका बसला आहे. या पार्श्वभूमीवर शासनाचे लक्ष वेधण्यासाठी बळीराजा संघर्ष समितीच्या वतीने सेलू तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. निवेदन देताना तहसीलदारांशी सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी तहसीलदार मगर यांनी या मागण्यांबाबत आपल्या स्तरावर योग्य तो पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.
या प्रसंगी बळीराजा संघर्ष समितीचे अध्यक्ष अशोक अण्णासाहेब काकडे यांच्यासह रमेशराव डख, रमेश माने, विजय भुजबळ, कॉ. रामेश्वर पौळ, कॉ. दत्तू सिंग ठाकूर, रामेश्वर गाडेकर, गणेशराव काष्टे, कॉ. अशोक उफाडे आदी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis