
नवी दिल्ली , 06 एप्रिल (हिं.स.)।भारताचे आठवे जहाज ‘ग्रीन आशा’ने होर्मुझ सामुद्रधुनी यशस्वीरित्या पार केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय जहाज ‘ग्रीन आशा’वर सुमारे 20,000 टन एलपीजी असल्याचा अंदाज आहे. भारतीय वेळेनुसार रविवारी दुपारी 3:30 वाजता ‘ग्रीन आशा’ हे जहाज इराणच्या लारक, केशम आणि होर्मुझ बेटांदरम्यान असलेल्या इराणी जलक्षेत्रातून मार्गक्रमण करून सामुद्रधुनीच्या पूर्व भागात प्रवेश केले होते.
सूत्रांच्या माहितीनुसार, 28 फेब्रुवारीला युद्ध सुरू झाल्यानंतर एलपीजी वाहून नेणारे होर्मुझ सामुद्रधुनी पार करणारे हे आठवे भारतीय जहाज ठरले आहे. यापूर्वी ‘ग्रीन सांवरी’ या भारतीय जहाजाने शुक्रवारी रात्री होर्मुझ सामुद्रधुनी सुरक्षितपणे पार केली होती. या जहाजावर सुमारे 46,650 मेट्रिक टन एलपीजीचा माल होता.
माहितीनुसार, व्यापारी जहाजांना मदत करण्यासाठी भारतीय नौदलाची युद्धनौका पूर्णपणे सज्ज ठेवण्यात आली आहे. पश्चिम आशियात सुरू असलेल्या संघर्षामुळे निर्माण झालेल्या समुद्री नाकेबंदीच्या पार्श्वभूमीवर, केंद्र सरकार भारतीय जहाजांना होर्मुझ सामुद्रधुनीतून सुरक्षित मार्ग मिळावा यासाठी इराणी अधिकाऱ्यांशी सातत्याने चर्चा करत आहे.यापूर्वी जहाजरानी मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, फारसी आखातात 18 भारतीय जहाजे आणि सुमारे 485 खलाशी उपस्थित आहेत.
खाडी प्रदेशातील अलीकडील घडामोडींवर आयोजित संयुक्त पत्रकार परिषदेत बंदरे, जहाजरानी आणि जलमार्ग मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव मुकेश मंगल यांनी सांगितले की, फारसी आखातात असलेल्या सर्व भारतीय जहाजांवर आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.ते पुढे म्हणाले, “फारसी आखातात असलेले सर्व खलाशी पूर्णपणे सुरक्षित आहेत.” आतापर्यंत एकूण 964 हून अधिक खलाशांना भारतात परत आणण्यात आले असून देशातील सर्व बंदरांचे कामकाज सुरळीत सुरू आहे.बंदरांच्या कामकाजाबाबत त्यांनी सांगितले, “बंदरे, जहाजरानी आणि जलमार्ग मंत्रालय, परराष्ट्र मंत्रालय, परदेशातील भारतीय दूतावास तसेच समुद्री क्षेत्राशी संबंधित इतर घटकांशी आम्ही सातत्याने समन्वय ठेवत आहोत.”
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode