

नवी दिल्ली, 22 मे (हिं.स.)। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी सांगितले की, मंत्रिपरिषदेच्या बैठकीत ‘ईज ऑफ लिव्हिंग’, ‘ईज ऑफ डुइंग बिझनेस’ आणि सुधारणांना गती देण्याशी संबंधित विविध मुद्द्यांवर व्यापक चर्चा करण्यात आली.
पंतप्रधान मोदी यांनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले की, गुरुवारी झालेली मंत्रिपरिषदेची बैठक अत्यंत सार्थक ठरली. बैठकीदरम्यान मंत्र्यांमध्ये विविध विषयांवरील विचार आणि सर्वोत्तम कार्यपद्धतींची देवाणघेवाण झाली. त्यांनी सांगितले की, सर्वसामान्यांचे जीवन अधिक सुलभ करणे, व्यवसाय सुलभता वाढवणे आणि सुधारणांच्या प्रक्रियेला वेग देणे यावर विशेष भर देण्यात आला, जेणेकरून ‘विकसित भारत’चा सामूहिक संकल्प साकार करता येईल.
विशेष म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी सायंकाळी मंत्रिपरिषदेच्या बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवले आणि सर्व मंत्र्यांच्या कामकाजाच्या रिपोर्ट कार्डचा आढावा घेतला. सेवा तीर्थ येथे सायंकाळी सुमारे ५ वाजता सुरू झालेली ही उच्चस्तरीय बैठक जवळपास साडेचार तास चालली. या मॅरेथॉन बैठकीत प्रशासनिक सुधारणा, कार्यक्षम शासन व्यवस्था आणि सरकारच्या दीर्घकालीन “विकसित भारत २०४७” या दृष्टिकोनावर सविस्तर चर्चा झाली.
बैठकीत सुमारे ९ मंत्र्यांनी आपल्या मंत्रालयांच्या कामकाजाचे सविस्तर सादरीकरण केले. तसेच अनेक मंत्र्यांच्या कामकाजाचाही आढावा घेण्यात आला. याशिवाय सरकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी, परस्पर समन्वय आणि भविष्यातील रणनीती यासंदर्भात मंत्र्यांसोबत विचारमंथन करण्यात आले. यात मंत्र्यांच्या मागील कामकाजाचा लेखाजोखा आणि दोन वर्षांच्या रिपोर्ट कार्डचाही आढावा घेण्यात आला. विशेषतः पश्चिम आशियातील सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन सरकारच्या आर्थिक धोरणांवर, विकास प्रकल्पांवर आणि भविष्यातील रोडमॅपवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule