अहिल्यानगरमध्ये आमरसातून केमिकल्स पोटात गेल्याने सात जण बेशुद्ध, एकावर उपचार सुरू
अहिल्यानगर, 23 मे (हिं.स.) - येथील शेवगावला राहणाऱ्या जायभाय कुटुंबातील सात जणांना आंब्याचा रस खाल्ल्यानंतर विषबाधा झाल्याची घटना गेल्या रविवारी घडली. यामध्ये एका चार वर्षांच्या चिमुरडीचाही समावेश आहे. जायभाय कुटुंबावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या
आंबे


अहिल्यानगर, 23 मे (हिं.स.) - येथील शेवगावला राहणाऱ्या जायभाय कुटुंबातील सात जणांना आंब्याचा रस खाल्ल्यानंतर विषबाधा झाल्याची घटना गेल्या रविवारी घडली. यामध्ये एका चार वर्षांच्या चिमुरडीचाही समावेश आहे. जायभाय कुटुंबावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या मते संबंधित कुटूंबीयांनी जे आंबे खाल्ले ते पिकवण्यासाठी 'कॅल्शियम कार्बाइड'चा वापर केलेला असू शकतो. कॅल्शियम कार्बाइड ओलाव्याच्या संपर्कात आल्यावर 'एसिटिलीन' नावाचा वायू सोडतो, जो माणसासाठी घातक ठरतो. अशा पध्दतीने 'कॅल्शियम कार्बाइड' वापरणे हे बेकायदेशीर आहे. संबंधित कुटुंबाला रुग्णालयात आणल्यानंतर त्यांना जी लक्षण दिसत होती, त्यावरून एशियन हॉस्पिटलचे डॉ. सचिन पांडुळेंनी हा अंदाज बांधला आहे.

शेवगाव शहरातील आरे वस्तीवर राहणाऱ्या भाऊसाहेब जायभाय यांनीही बाजारातून आंबे खरेदी केले. कुटुंबातील सर्वांनी आंब्याचा रस खाल्ला, त्यानंतर जायभाय कुटुंबातील सात जणांना चक्कर येणे, तोल जाणे असा त्रास सुरू झाला. नातेवाईकांनी सुरुवातीला सर्वांना शेवगावमधील खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले, परंतु सर्वांची प्रकृती बिघडल्याने त्यांना अहिल्यानगर शहरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काही केमिकल्स पोटात गेल्याने अशा प्रकारचा त्रास होऊ शकतो असे उपचार करणारे डॉ.सचिन पांडुळे यांनी सांगितले. दरम्यान, सात रुग्णापैकी सहा जणांना रुग्णालयातून वेगवेगळ्या दिवशी डिस्चार्ज देण्यात आला असून एकावर अजूनही उपचार सुरू आहे, मात्र सर्वांची प्रकृती स्थिर आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, जायभाय कुटुंबाने मार्केटमधून आंबे आणले होते. रात्रीच्या जेवणात सर्वांनी आंब्याचा रस खाल्ला. मात्र, जेवणानंतर काही वेळातच त्यांना त्रास होऊ लागला. कुटुंबातील मोठा भाऊ उशीरा जेवत असल्याने तो वाचला. त्याने पाहिले की घरातील सर्व सदस्य अचानक बेशुद्ध पडले आहेत. प्रसंगावधान राखत त्याने तातडीने सर्वांना जवळच्या एशियन हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले.

केमिकलने पिकवलेले आंबे विक्री केली जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पंचायत समिती आणि आरोग्य विभागाच्या वतीने तपासणी मोहीम हाती घेण्यात आली आहे. कॅल्शियम कार्बाईडने पिकवलेल्या आंब्यांचा संशय आल्याने विक्रेत्यांकडील आंब्यांचे नमुने तपासणीसाठी ताब्यात घेण्यात आले आहेत. ताब्यात घेतलेले आंबे पुण्यातील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहेत. केमिकलने पिकवलेल्या आंब्यांमुळे लहान मुलांसह नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच, आरोग्य विभागाने ही तपासणी मोहीम हाती घेतली आहे. तपासणी अहवालानंतर पुढील कारवाई केली जाणार आहे. दरम्यान, या तपासणी कारवाईनंतर पाथर्डी शहरातील फळविक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

मुंबईत गेल्या महिन्यात एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. विशेष म्हणजे, कलिंगड आणि बिर्याणी खाल्ल्यानंतर या चौघांचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक वृत्त आल्याने खळबळ उडाली होती. मात्र विषबाधा झाल्यानेच हा मृत्यू झाल्याचे पोलीस आणि फॉरेन्सिक तपासातून सत्य समोर आलं.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande