
बीड, 23 मे (हिं.स.)। वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळांतर्गत राबवल्या जाणाऱ्या वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेला बीड जिल्ह्यात बँकांच्या मंजुरीअभावी मोठा ब्रेक लागला आहे. सन २०२०-२१ ते २०२५-२६ या पाच वर्षांच्या कालावधीत महामंडळाने ६७० पात्र लाभार्थ्यांचे प्रस्ताव पडताळणी करून बँकांकडे पाठवले होते. मात्र, बँकांनी त्यांच्या जाचक निकष आणि नियमांचे कारण पुढे करत यातील तब्बल ९१.५ टक्के म्हणजेच ५७० कर्ज प्रस्ताव नामंजूर केले आहेत. या पाच वर्षांत केवळ ५७ प्रस्तावांनाच बँकांकडून मंजुरी मिळून प्रत्यक्ष कर्जवाटप होऊ शकले आहे. याशिवाय, जनजागृतीच्या अभावामुळे मागील पाच वर्षांत महामंडळाच्या बीज भांडवल आणि गट कर्ज योजनांसाठी एकही अर्ज प्राप्त झालेला नाही. बँकांच्या या असहकार्यामुळे गरजू आणि कष्टाळू घटकांसाठी असलेल्या महामंडळाच्या महत्त्वाच्या कर्ज योजना बीड जिल्ह्यात पूर्णपणे ठप्प झाल्याचे विदारक चित्र समोर आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis