
बीड, 23 मे (हिं.स.)। बीड नगर परिषद प्रशासनाने शहरातील विविध भागांतील अवैध अतिक्रमणे हटवण्याची धडक मोहीम सुरू केली असली, तरी त्याला व्यावसायिक केराची टोपली दाखवत असल्याचे चित्र आहे. दोन दिवसांपूर्वीच शहरातील राजीव गांधी चौक परिसरातून पालिकेने हटवलेले अतिक्रमण पुन्हा 'जैसे थे' झाले आहे. रस्त्याच्या कडेला बसण्यास प्रतिबंध केलेले टपरीचालक आणि हातगाडीवाल्यांनी आपले गाडे पुन्हा रस्त्यावर आणून उभे केले आहेत. नियमांचे उल्लंघन करून पुन्हा अतिक्रमण करणाऱ्या या व्यावसायिकांना कोणाचे तरी राजकीय पाठबळ असल्याचा संशय स्थानिक नागरिकांमधून व्यक्त केला जात आहे. या प्रकारामुळे वाहतुकीची कोंडी होत असून अशा पुनरावृत्ती करणाऱ्यांवर पालिकेने दंडात्मक व ठोस कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis