मार्को रुबियो यांच्या भारत दौऱ्याला कोलकाता येथून सुरुवात; पत्नीसह मदर हाऊसला भेट
कोलकाता, 23 मे (हिं.स.)। अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो यांनी शनिवारी सकाळी पत्नीसह कोलकाता येथे दाखल झाले आणि भारत दौऱ्याची सुरुवात केली. नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरल्यावर ते थेट तालतला येथील मदर टेरेसा हाऊसकडे रवान
Marco rubio kolkata india tour


Marco rubio kolkata india tour


कोलकाता, 23 मे (हिं.स.)। अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो यांनी शनिवारी सकाळी पत्नीसह कोलकाता येथे दाखल झाले आणि भारत दौऱ्याची सुरुवात केली. नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरल्यावर ते थेट तालतला येथील मदर टेरेसा हाऊसकडे रवाना झाले. त्यांच्या या भेटीमुळे कोलकात्यात कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती. दुपारनंतर त्यांचे दिल्लीकडे प्रस्थान होणार असून तेथे त्यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी महत्त्वपूर्ण भेट निश्चित आहे.

भारतामध्ये अमेरिकेचे राजदूत सर्जियो गोर यांनी एक्सवर रुबियो यांच्या कोलकाता आगमनाची माहिती दिली. दिल्लीतील बैठकीत व्यापार, तंत्रज्ञान, संरक्षण आणि क्वाड यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा होणार असल्याचे त्यांनी सांगितले. या भेटीत दोन्ही देशांमधील धोरणात्मक सहकार्य अधिक दृढ करण्यावर भर दिला जाणार आहे. जागतिक पातळीवर बदलत असलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ही चर्चा विशेष महत्त्वाची मानली जात आहे.

पश्चिम आशियातील वाढता तणाव, अमेरिका-इराण यांच्यातील वाढते मतभेद आणि आंतरराष्ट्रीय समुद्री मार्गांवरील सुरक्षितता हेही या दौऱ्यातील महत्त्वाचे मुद्दे ठरणार आहेत. भारत सातत्याने संवादाच्या माध्यमातून शांतता प्रस्थापित करण्याचे आवाहन करत आला आहे. विशेषतः होर्मुझच्या सामुद्रधुनीतून मालवाहू जहाजांची अविरत आणि सुरक्षित वाहतूक सुरू राहावी, यावर भारताने अनेकदा भर दिला आहे. त्यामुळे या पार्श्वभूमीवर रुबियो यांचा दौरा केवळ द्विपक्षीय संबंधांसाठीच नव्हे, तर प्रादेशिक स्थैर्यासाठीही महत्त्वाचा ठरतो.

कोलकात्यात रवाना होण्यापूर्वी मार्को रुबियो यांनी भारत हा अमेरिकेचा “अत्यंत जवळचा मित्र” असल्याचे म्हटले होते. भारतीय मंत्र्यांबरोबर तसेच क्वाड देशांच्या प्रतिनिधींशी होणाऱ्या भेटींसाठी आपण उत्सुक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. त्यांच्या या वक्तव्यामुळे भारत-अमेरिका संबंधांतील सामंजस्य आणि परस्पर विश्वास अधोरेखित झाला आहे.

रुबियो आपल्या भारत दौऱ्याच्या अखेरच्या दिवशी, २६ मे रोजी होणाऱ्या क्वाड बैठकीतही सहभागी होणार आहेत. या बैठकीला भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर, ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्रमंत्री पेनी वोंग आणि जपानचे परराष्ट्रमंत्री मोटेगी तोशिमित्सु उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील सहकार्य, सुरक्षा आणि रणनीतिक समन्वयावर विशेष चर्चा अपेक्षित आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande