
अमरावती, 24 मे (हिं.स.)।खरीप हंगामासाठी कापूस, सोयाबीन, तूर, मका, मूग आणि उडीद या प्रमुख पिकांचे नियोजन करण्यात आले आहे. कापसासाठी १२.५० लाख बियाणे पाकिटांची तर सोयाबीनसाठी ६५ हजार ३५० क्विंटल बियाण्यांची मागणी नोंदविण्यात आली आहे.कृषी विभागाकडून खरीपाचे नियोजन करण्यात आले असून जिल्ह्यात यंदा ६ लाख ७७ हजार हेक्टरवर पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे. प्रस्तावित क्षेत्रानूसार१ लाख ३८ हजार मेट्रिक टन खत मंजूर करण्यात आले आहे. त्यामध्ये युरिया, डीएपी, एसएसपी, एमओपी आणि संयुक्त खतांचा समावेश आहे.१३ मेपर्यंत जिल्ह्यात ८५ हजार २६९ मेट्रिक टन खत उपलब्ध झाले असून टंचाई टाळण्यासाठी कंपनीनिहाय आणि तालुकानिहाय नियोजन सुरू करण्यात आले आहे.
आगामी खरीप हंगाम २०२६- २७ लक्षात घेता जिल्हा प्रशासन आणि कृषी विभागाने व्यापक तयारी पूर्ण केली असून बियाणे, खतसाठा, सिंचन व्यवस्थापन, गुणवत्ता नियंत्रण आणि एलनिनोच्या संभाव्य धोक्याविरोधात विशेष कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. जिल्ह्यातीलसुमारे ४.५६ लाख शेतकऱ्यांसाठी विविध उपाययोजना राबविल्या जात असून खरीप हंगाम सुरळीत पार पडण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे.
खरीपात ५८,६२८ हेक्टर सिंचनाचे नियोजन
▲ जिल्ह्यातील ७१ प्रकल्पांद्वारे १ लाख ९९ हजार १२२ हेक्टर सिंचन क्षमता निर्माण करण्यात आली असून प्रत्यक्ष १ लाख ६७ हजार ७८० हेक्टर क्षमता उपलब्ध झाली आहे. आगामी खरीप हंगामासाठी ५८ हजार ६२८ हेक्टर सिंचनाचे नियोजन करण्यात आले आहे. खरीप आणि रब्बी मिळून १ लाख ७ हजार ७२६ हेक्टर सिंचनाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
६६१० मोहिमांद्वारे शेतकऱ्यांमध्ये जनजागृती
▲ १० मेपर्यंत जिल्ह्यात तब्बल ६६१० विविध मोहिमा राबविण्यात आल्या आहेत. त्यामध्ये एलनिनो जनजागृती, हवामान अनुकूल तंत्रज्ञान, बीज प्रक्रिया, माती परीक्षण, हुमणी कीड व्यवस्थापन, बोंडअळी नियंत्रण, जैविक शेती, शून्य मशागत, ट्रायकोकार्ड वापर आणि शिवार फेऱ्यांचा समावेश आहे. हुमणी कीड व्यवस्थापनासाठी ८७५ मोहिमा, हवामान अनुकूल तंत्रज्ञानासाठी १७८४ प्रात्यक्षिके आणि गावनिहाय प्रशिक्षणासाठी ६३८ मोहिमा घेण्यात आल्यात.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी