
अमरावती, 24 मे (हिं.स.)।
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत ग्रामपंचायत आदर्श देवगावने उल्लेखनीय कामगिरी करीत तालुकास्तरावर पुन्हा एकदा आदर्श ग्रामपंचायत बनण्याचा मान मिळविला. ग्रामविकास, स्वच्छता, आरोग्य, पाणीपुरवठा, लोकसहभाग, प्रशासनातील पारदर्शकता तसेच विविध शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणीमध्ये उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल ग्रामपंचायत देवगावचा सन्मान करण्यात आला आहे. गावाच्या विकासासाठी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत अधिकारी व कर्मचारी यांनी सातत्याने प्रयत्न केले. तसेच गावातील आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस, शिक्षक वृंद, स्वच्छता कर्मचारी तसेच विविध विभागांतील कर्मचारी यांनीही अभियान यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले. आरोग्य, पोषण, शिक्षण व जनजागृती विषयक विविध उपक्रम गावपातळीवर प्रभावीपणे राबविण्यात आले. गाव स्वच्छ, सुंदर व विकासाभिमुख करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने आपली जबाबदारी ओळखून सहभाग नोंदविला.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानामध्ये मिळालेल्या या यशाबद्दल ग्रामपंचायत आदर्श देवगावच्या वतीने सर्व ग्रामस्थांचे आभार. भविष्यातही गावाच्या सर्वांगीण विकासासाठी अधिक जोमाने कार्य करण्यास सहकार्य करावे. शासनाच्या विविध योजना तळागाळातील प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचविण्यासाठी ग्रामपंचायत कटिबद्ध राहील. -आशाताई येवले, सरपंच, देवगाव.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी