
नाशिक, 24 मे (हिं.स.)।
-लीजहोल्ड औद्योगिक जमिनीवरील हक्कांच्या हस्तांतरणावर (प्लॉट ट्रान्सफर) जीएसटी लागू होत नसल्याचा सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय स्वागतार्ह असून यामुळे राज्यातील हजारो उद्योजकांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे अंबड इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन(आयमा)चे अध्यक्ष राजेंद्र पानसरे यांनी सांगितले.तसेच एमआयडीसीने आजवर वसूल केलेला जीएसटी तात्काळ उद्योजकांना परत करावा,अशी मागणीही त्यांनी केली आहे. या ऐतिहासिक निर्णयामुळे औद्योगिक क्षेत्रातील भूखंड हस्तांतरणाचे व्यवहार अधिक सुलभ, पारदर्शक आणि न्याय्य होण्यास मदत होणार आहे. मंदीमुळे आर्थिक संकटात असलेल्या उद्योजकांना या निर्णयाने नव संजीवनी मिळणार असल्याचेही पानसरे यांनी पुढे नमूद केले. या निर्णयामुळे औद्योगिक भूखंडांच्या हस्तांतरण प्रक्रियेला कायदेशीर स्पष्टता मिळाली आहे.उद्योजकांचे मनोबल त्यामुळे उंचावेल.जीएसटी परताव्याबाबत शासन आणि एमआयडीसीने लवकर निर्णय घ्यावा आणि हा परतावा व्याजासकट अदा करावा तसेच जीएसटीसंदर्भात उद्योजकांना ज्या नोटिसा काढण्यात आल्या आहेत त्या परत घेण्यात याव्यात अशी मागणीही पानसरे यांनी केली आहे. यासाठी आयमा पाठपुरावा करणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV