
नाशिक, 24 मे (हिं.स.)। कळवण तालुक्यातील रवळजी येथील मोठीदरी शिवारातील शेतकरी बाळू भावराव पवार (पवारवस्ती) यांच्या गट नं. २९८ मधील राहत्या घराशेजारील गोठ्यात दावणीला बांधलेल्या शेळ्यांवर रात्री नऊ वाजेच्या सुमारास बिबट्याने हल्ला करत दोन शेळ्या ठार केल्याची घटना घडली. यावेळी आजूबाजूच्या दहा- बारा शेतकऱ्यांनी आरडाओरड करीत रात्रीच्या अंधारात आजूबाजूला बॅटरी लावून पाहिले असता त्यांना बॅटरीच्या प्रकाशात दोन बिबटे शेजारील डोंगरकडे पळून जातांना दिसले.
गेल्या काही दिवसांपासून रवळजी शिवारातील मोठीदर परिसरात बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. पंधरा-वीस दिवसांपूर्वी येथील शेतकरी भाऊसाहेब पवार यांच्या घराशेजारील गोठ्यात एक बोकड फस्त केले होते. आता शुक्रवारी पुन्हा दोन शेळ्या फस्त केल्याने बिबट्याच्या दहशतीने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दि. 20 रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास पवारवस्ती शिवारात दोन बिबटे फिरताना प्रत्यक्ष आढळले असल्याचे येथील शेतकरी काळू पवार यांनी सांगितले. वनविभागाने पिंजरा लावून बिबट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी केली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV