
धर्मशाला, 25 मे (हिं.स.)आयपीएल २०२६ मध्ये गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुचा पहिल्या क्वालिफायरमध्ये गुजरात टायटन्सशी मुकाबला रंगणार आहे. या सामन्याचा विजेता थेट अंतिम फेरीत प्रवेश करणार आहे. आरसीबी १८ गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थानी आहे. गुजरातचेही ९ विजयांसह १८ गुण होते. पण आरसीबीपेक्षा कमी नेट रन रेटमुळे त्यांना दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले.
आयपीएलमध्ये आतापर्यंत आरसीबी आणि गुजरात टायटन्स यांच्यात आठ सामने खेळले गेले आहेत. विक्रम बरोबरीत आहे. आरसीबीने चार, तर जीटीनेही चार सामने जिंकले आहेत. या हंगामात दोन्ही संघांमध्ये खेळलेले दोन सामने १-१ अशा बरोबरीत संपले. त्यामुळे धर्मशाला येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत अपेक्षित आहे.
आयपीएल २०२६ मध्ये गुजरात टायटन्ससाठी गोलंदाजी ही सर्वात मोठी ताकद ठरली आहे. गुजरातकडे सर्वाधिक बळी घेणाऱ्या पहिल्या १० गोलंदाजांपैकी तीन गोलंदाज आहेत. रबाडाने २४, रशीदने १९ आणि सिराजने १७ बळी घेतले आहेत. आरसीबीसाठी भुवनेश्वर कुमारने २४ बळी घेतले आहेत, पण त्याच्यानंतर अव्वल १० गोलंदाजांमध्ये दुसरा कोणीही नाही. संघाला सहावा गोलंदाजीचा पर्याय शोधण्यात अडचण येत आहे. रोमारियो शेफर्डने सुमारे १२ च्या इकॉनॉमी रेटने धावा दिल्या आहेत. गुजरात टायटन्सकडे ७-८ गोलंदाजीचे पर्याय आहेत.
गुजरात टायटन्सची फलंदाजी त्यांच्या पहिल्या तीन फलंदाजांवर अवलंबून आहे: शुभमन गिल, साई सुदर्शन आणि जोस बटलर. गिल आणि सुदर्शन ऑरेंज कॅपच्या शर्यतीत पहिल्या दोन स्थानांवर आहेत. दुसरीकडे, आरसीबीकडे एक मजबूत फलंदाजी फळी आहे. फिल सॉल्ट तंदुरुस्त आणि चांगल्या स्थितीत आहे. विराट कोहली, देवदत्त पडिक्कल, रजत पाटीदार, जितेश शर्मा, टिम डेव्हिड आणि रोमारियो शेफर्ड हे देखील कृणाल पांड्यासोबत संघात आहेत.
गुजरात आणि आरसीबी सध्या बरोबरीत असल्याचे दिसत असून, धरमशाला येथे जो संघ चांगली कामगिरी करेल त्याला आयपीएल अंतिम सामन्यात थेट स्थान मिळेल. शिवाय, गुजरात आणि आरसीबी या दोन्ही संघांनी एकदा आयपीएलचे विजेतेपद पटकावले असून, आता दोन्ही संघांना दुसऱ्यांदा ही ट्रॉफी जिंकण्याची संधी आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे