
लातूर, 28 मे (हिं.स.)।
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात सिंहाचा वाटा असून, त्यांचे विचार कायम प्रेरणादायी आहेत. आजच्या तरुणांनी त्यांचे हे प्रखर विचार आत्मसात करून देशाप्रती आपले कर्तव्य बजावले पाहिजे, असे प्रतिपादन सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी येथे केले. अहमदपूर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर चौकात सावरकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित ध्वजारोहण व रक्तदान शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते मुख्य अतिथी म्हणून बोलत होते.
या कार्यक्रमाप्रसंगी व्यासपीठावर नगराध्यक्ष स्वप्निल व्हते, प्रदेश सरचिटणीस शिवानंद हेगणे, सिद्धी शुगर अँड अलाईड इंडस्ट्रीजचे व्यवस्थापकीय संचालक अविनाश जाधव, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष शिवाजीराव देशमुख, धनंजय जोशी, शरद जोशी, नगरसेवक अमित रेड्डी, प्रशांत भोसले यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना मंत्री बाबासाहेब पाटील म्हणाले की, महापुरुषांच्या जयंती निमित्त समितीच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे ते अत्यंत कौतुकास्पद आहे. रक्तदान ही आजच्या काळाची मोठी गरज असून आपल्या रक्तदानामुळे एखाद्या व्यक्तीचा मौल्यवान जीव वाचू शकतो. त्यामुळे अहमदपूर शहरातील विविध सामाजिक संघटनांनी अशा प्रकारच्या रक्तदान शिबिरांसाठी नेहमीच पुढे येऊन पुढाकार घेतला पाहिजे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
याप्रसंगी स्वातंत्र्यवीर सावरकर चौकाच्या सुशोभीकरणासाठी सहकार मंत्र्यांनी २० लाख रुपयांचा निधी घोषित केला. तसेच या चौकात सध्या असलेला अर्धाकृती पुतळा भविष्यात पूर्णकृती करण्यासाठी आपण स्वतः पुढाकार घेऊ, अशी ग्वाही देखील बाबासाहेब पाटील यांनी यावेळी दिली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis