
बीड, 30 मे (हिं.स.)। शिरूरसहपंचक्रोशीतील भाविकांचे श्रध्दास्थानी असलेल्या धाकट्या अलंकापुरीत तथा सिध्देश्वर संस्थानवर स्वामी विवेकानंद गिरीजी आनंदवन आश्रम कांदिवली यांचे संकल्पनेतून व उत्तराधिकारी महंत विवेक महाराज शास्त्री यांचे मार्गदर्शनाखाली रात्रंदिवस राम कृष्ण हरी या चक्रीभजनाचा उपक्रम सुरू आहे.
अधिक मास तथा पुरूषोत्तम मास या महापर्वणीवर शिरूरसह पंचक्रोशीतील भाविकांनी चक्रिभजनाच्या माध्यमातून एक कोटी एक्कावन्न लाख राम कृष्ण हरी मंत्राची जप माळ समर्पित केली. विवेकमहाराज शास्त्री यांचे काल्याचे कीर्तन व नंतर कान्होबाची वाडी ग्रामस्थांचा धोंडेजेवनाचा महाप्रसाद होणार आहे.वै. आबादेव महाराज यांनी त्यांचे कार्यकाळात असाच चक्रीभजनाचा उपक्रम केला होता. तोच धागा पकडून याही वर्षी हा कार्यक्रम घेण्यात आला. संस्थानशी जोडलेल्या वीस बावीस गावांनी आपला सहभाग नोंदवला. लहाण, मोठे, स्त्री, पुरूष अशा सर्वांनी या चक्रीभजनाचा आनंद घेतला. परमार्थातात सर्वोत्तम मानली जाणारी नामसाधना आणि ती देखील सामुहिक पध्दतीने एक वेगळे महत्व व फलप्राप्त करून देणारी मानली जाते. उर्वरीत कालावधीत या चक्रीभजनात सहभाग घेऊन अधिक मासाचा अधिक पुण्यसंचय करावा असे आवाहन महंत विवेक महाराज शास्त्री यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis