
लातूर, 30 मे (हिं.स.): लातूर जिल्ह्यातील पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा पूर्णपणे सुरळीत असून आगामी काळातही यात कोणताही खंड पडणार नाही, अशी हमी पेट्रोलियम कंपन्यांनी दिली आहे. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच अनावश्यक इंधनाची अतिरिक्त खरेदी किंवा साठवणूक करू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी केले आहे.
लातूर जिल्ह्यातील पेट्रोल व डिझेल पुरवठ्याचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील पेट्रोल पंप असोसिएशनचे पदाधिकारी व पेट्रोलियम कंपन्यांच्या प्रतिनिधींची बैठक पार पडली. या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील इंधनाच्या उपलब्धतेचा सविस्तर आढावा घेतला. जिल्ह्याला आवश्यक असणारा पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा नियमितपणे सुरू असून भविष्यातही हा पुरवठा असाच अखंडित सुरू राहील, अशी माहिती पेट्रोलियम कंपन्यांच्या प्रतिनिधींनी यावेळी दिली.
ग्रामीण भागात सध्या मान्सूनपूर्व शेती मशागतीची कामे मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंपांवर पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा सतत उपलब्ध ठेवण्यात यावा आणि शेती मशागतीच्या कामासाठी शेतकऱ्यांना, तसेच उद्योग-व्यवसाय आणि जलसंधारणाच्या कामांसाठी आवश्यक असलेल्या प्रमाणात डिझेल तात्काळ उपलब्ध करून दिले जावे, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. बास्टेवाड यांनी दिल्या. पेट्रोलियम कंपन्यांनी यावर सकारात्मक प्रतिसाद दिला असून, जिल्ह्यात कुठेही पेट्रोल किंवा डिझेलचा तुटवडा निर्माण होणार नाही, अशी ग्वाही त्यांनी प्रशासनाला दिली.
नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता अतिरिक्त स्वरूपात पेट्रोल किंवा डिझेलची खरेदी करू नये. आवश्यक तेवढेच इंधन खरेदी करून पेट्रोल पंपांवरील अनावश्यक गर्दी टाळावी, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. जिल्हा प्रशासन सर्व पेट्रोलियम कंपन्या व पेट्रोल पंप चालकांच्या सतत संपर्कात असून जिल्ह्यात पेट्रोल व डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis