
जळगाव, 30 मे (हिं.स.) जिल्हा पोलिस दलात मोठ्या प्रमाणावर फेरबदल करत जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी तब्बल ४३ पीएसआयसह ३९९ पोलिस अधिकारी, अंमलदार आणि कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश गुरुवारी जारी केले आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणावर अंतर्गत बदल्या झाल्याने जळगाव पोलिस वर्तुळात या निर्णयाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
जारी करण्यात आलेल्या अधिकृत आदेशानुसार, एकूण बदल्यांपैकी ३४२ पोलिस कर्मचाऱ्यांच्या बदल्या या ‘प्रशासकीय कारणास्तव’ करण्यात आल्या आहेत. याशिवाय ४० कर्मचाऱ्यांनी स्वतःहून केलेल्या विनंतीचा मान ठेवून त्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत, तर १७ चालक कर्मचाऱ्यांचाही या बदली प्रक्रियेत समावेश आहे.पोलिस शिपाई, पोलिस नाईक, हवालदार, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक तसेच महिला कर्मचारी आणि चालक यांपैकी अनेकांनी सध्याच्या पोलीस ठाण्यात ५ वर्षांचा सेवाकाळ पूर्ण केला होता. शासकीय नियमानुसार ते बदलीस पात्र ठरल्याने, जिल्हा पोलिस आस्थापना मंडळाच्या झालेल्या बैठकीत या बदल्यांवर अंतिम मोहर उमटवण्यात आली.पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी बदली झालेल्या अंमलदारांना संबंधित पोलिस स्टेशन आणि शाखांच्या प्रभारी अधिकाऱ्यांना बदली झालेले अंमलदार जर तपासी अंमलदार असतील, तर त्यांच्याकडील प्रलंबित गुन्हे, अर्ज चौकशी आणि इतर सर्व शासकीय दस्तऐवज पूर्णपणे हस्तगत करूनच त्यांना नवीन ठिकाणी कार्यमुक्त करावे, असे आदेश दिले आहे.बदली झालेल्या सर्व अंमलदारांचे जून महिन्याचे मासिक वेतन त्यांच्या नवीन बदलीच्या ठिकाणीच काढले जाईल. जर एखाद्या प्रभारी अधिकाऱ्याने संबंधित अंमलदाराला वेळेत कार्यमुक्त केले नाही किंवा अंमलदार नवीन ठिकाणी हजर झाला नाही, तर जून महिन्यापासून त्याचे वेतन रोखले जाईल, असे आदेशात स्पष्ट केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर