
बीड, 06 मे (हिं.स.)। परळी तालुक्यातील पांगरी येथील ओंकार शुगर्स कारखान्याने जानेवारी ते मार्च दरम्यानच्या गाळपाचे पैसे अद्याप न दिल्याने संतप्त ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी कारखान्यावर धडक देत तीव्र निदर्शने केली. ऊस उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात शेतकऱ्यांनी प्रशासनाचा तीव्र निषेध नोंदवला. गेल्या चार महिन्यांपासून केवळ पोकळ आश्वासने देऊन वेळकाढूपणा केला जात असल्याचा आरोप करत शेतकऱ्यांनी आता आरपारची भूमिका घेतली आहे.
येत्या तीन दिवसांत थकीत देयके, वाहतूक खर्च आणि तोडणी मजुरांची मजुरी अदा न केल्यास ८ मे रोजी साखर कारखान्याला टाळे ठोकण्याचा खणखणीत इशारा यावेळी देण्यात आला. भर उन्हात झालेल्या या आंदोलनात एड. अजय बुरांडे, मुरलीधर नागरगोजे यांच्यासह शेकडो शेतकरी सहभागी झाले होते. वारंवार निवेदने देऊनही कारखानदारांनी दुर्लक्ष केल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संताप असून, कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा असा आर्त सवाल या निमित्ताने उपस्थित झाला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis