
जळगाव , 06 मे (हिं.स.) जळगाव ग्रामीण मतदारसंघ पूर्णपणे मोतीबिंदूमुक्त करण्याचा ध्यास पाळधी येथील ‘जीपीएस मित्र परिवाराने’ घेतला आहे. याचाच एक भाग म्हणून, गावकऱ्यांना गावातच दर्जेदार आरोग्य सेवा मिळावी या उद्देशाने ‘गावातच उपचार’ ही संकल्पना समोर ठेवून ‘फिरते नेत्रालय’ सुरू करण्यात आले आहे. या अभिनव आणि कौतुकास्पद सेवेचा रीतसर शुभारंभ राज्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
या मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात धरणगाव तालुक्यातील बिलखेडा आणि जळगाव तालुक्यातील आसोदा येथे जीपीएस मित्र परिवारातर्फे भव्य मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. दोन्ही गावांमध्ये नागरिकांचा या शिबिरांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. बिलखेडा येथे पालकमंत्री गुलाबराव पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रताप पाटील व पंचायत समितीचे माजी सभापती मुकुंद नन्नवरे उपस्थित होते.
बिलखेडा येथे ३६० तर आसोदा येथे २१० नागरिकांची नेत्र तपासणी करण्यात आली. त्यापैकी बिलखेडा येथे ७४ व आसोदा येथे ६० असे एकूण १३४ रुग्ण मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी निवडले गेले. यापैकी ९०पेक्षा अधिक रुग्णांना तत्काळ पनवेल येथे उपचारासाठी रवाना करण्यात आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर