
नाशिक, 06 मे (हिं.स.) : महाराष्ट्रात वारंवार अल्पवयीन मुली आणि महिलांवरील अत्याचारांच्या घटना घडत असल्याने संतापाची लाट उसळली आहे. अशा गंभीर गुन्ह्यांवर आळा बसण्यासाठी दोषींना त्वरित फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी नाशिक शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आकाश छाजेड यांनी केली आहे.
छाजेड यांनी राज्यातील कायदा व सुव्यवस्था परिस्थितीवर तीव्र टीका करताना सांगितले की, महाराष्ट्रात महिला सुरक्षित नाहीत. एका बाजूला गुन्हेगारी वाढत असताना, दुसरीकडे सत्ताधारी पक्षाचे नेते निवडणूक विजय साजरा करण्यात व्यस्त आहेत, हे अत्यंत निंदनीय आहे. संबंधित घटनेतील पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी सरकारने तत्परतेने पावले उचलली पाहिजेत, मात्र सरकार असंवेदनशीलपणे वागत असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच, राज्यपालांनी अशा सरकारला त्वरित बरखास्त करावे, अशी मागणीही त्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, नाशिक शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने काँग्रेस भवन येथे नुसरापूर येथील अल्पवयीन मुलीच्या हत्याकांडाच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले. यावेळी दोषीला फाशीची शिक्षा व्हावी, तसेच सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
या आंदोलनात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास सातभाई, ज्येष्ठ उपाध्यक्ष संदीप शर्मा, अल्तमश शेख, जावेद इब्राहिम, गौरव सोनार, तनवीर तांबोळी, स्वाती जाधव, वनिता मुलाने, धोंडीराम बोडके, मुस्ताक कुरेशी, अण्णा मोरे, संतोष ठाकूर, स्वप्निल पाटील, गुड्डी खान, जुली डिसूजा, असलम पैलवान, फारुख मन्सुरी, शिवाजी गंभीरे, शैलेश मैंद, प्रकाश माळी, सुनील राजपूत, जावेद काझी, डॉ. सय्यद नदीम, इमरान शेख, जावेद शेख, सईद मणियार, प्रवीण शेख, अनिता सूर्यवंशी, अफरोज खान, श्रद्धा सूर्यवंशी, गोरख साळवे, आयान खान आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
--------------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV